Crime News : संपत्तीच्या वादातून एका नराधम मुलाने आपल्याच कुटुंबातील चार सदस्यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. रविवारी (१ मार्च) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा रक्ताचा थरार घडला. वडिलांनी विकलेल्या जमिनीच्या आणि दागिन्यांच्या पैशांच्या वाटणीवरून घरात वाद सुरू झाला होता. रागाच्या भरात आरोपीने सर्व मर्यादा ओलांडून घरातील सदस्यांवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये चार जणांचा जागीच अंत झाला. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ज्योतिषाची लग्नाबाबत भविष्यवाणी, इंजिनिअर तरुणी चिंतेत, शेवटी भीतीमुळे आयुष्य संपवलं
सुदैवाने लहान बाळ सुरक्षित
या भीषण हत्याकांडात 62 वर्षीय वडील बडलूराम, 60 वर्षीय आई संजू देवी, 82 वर्षीय आजी शिताला आणि 20 वर्षीय बहीण पार्वती यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस घरात शिरले, तेव्हा अंगण आणि खोल्यांमध्ये रक्ताचा सडा पडलेला पाहून तेही हादरून गेले. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येच्या वेळी घरात असलेले एक लहान बाळ सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित वाचले आहे, ज्याला पोलिसांनी तातडीने आपल्या संरक्षणात घेतले. या हल्ल्यात कुटुंबातील इतर दोन सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावात मोठा पोलिस बंदोबस्त
गावातील शांतता भंग करणाऱ्या या किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी पोहोचलेल्या क्रमांकाच्या पथकाने जखमी गुरुदेव (40) आणि निरंकार (30) यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. निरंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राम नयन सिंह आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दुर्गा प्रसाद त्रिपाठी यांनी पीएसी जवानांसह गावात धाव घेतली असून, तणावपूर्ण परिस्थिती पाहता सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा : तिकिट हरवल्याचं सांगितलं अन् क्वार्टरवर नेऊन रेल्वे कर्मचाऱ्यानं तरुणीवर केला बलात्कार; नेमकं काय घडलं?
संपत्तीच्या वादावरुन मानसिक तणाव
फॉरेन्सिक टीमने रात्री उशिरा घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, घराबाहेरील झुडपातून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीच्या वादावरुन मानसिक तणावात होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस सध्या जखमींच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून या सामूहिक हत्याकांड मागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT











