Crime News : 11 मार्च रोजी एका पांढऱ्या पोत्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाने सगळेच हादरुन गेले होते. साधी ओळख पटवणे कठीण असलेल्या या मृतदेहाचे गूढ अखेर पोलिसांनी उकलले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथकांनी दिवस-रात्र एक करून, तब्बल 2,500 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यासोबतच पोलिसांनी 30 झोपडपट्ट्यांमधील 5000 लोकांची प्रत्यक्ष चौकशी करत या गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. उत्तराखंडच्या डेहराडून परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : माजी सैनिकाच्या हत्येने खळबळ, गळा चिरुन मृतदेह पुलाखाली टाकला; नेमकं कारण काय?
कौटुंबिक कलहाचा रक्तरंजित शेवट
या हत्याकांडाचा सूत्रधार दुसरा कोणी नसून मृत महिलेचा पती रंजीत शर्मा हाच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रंजीतने आपली पहिली पत्नी रूपा हिची गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलीस चौकशीत समोर आले की, रूपा आपल्या दुसऱ्या पतीला सोडून पुन्हा रंजीतकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, रंजीतने आधीच दुसरे लग्न केले होते. रूपा सतत रंजीतवर त्याच्या दुसऱ्या पत्नीला सोडण्यासाठी दबाव टाकत होती. याच वादाचे पर्यावसान 5 मार्चच्या रात्री एका भीषण संघर्षात झाले आणि संतापलेल्या रंजीतने रूपाचा जीव घेतला.
चार दिवस खोलीतच होता मृतदेह
हत्येनंतरचा घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा आहे. रंजीतने कोणालाही संशय येऊ नये म्हणून रूपाचा मृतदेह तब्बल चार दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला होता. 8 मार्चच्या रात्री संधी साधून त्याने मृतदेह एका पांढऱ्या गोणीत भरला आणि शीतला माता मंदिराजवळील निर्जन जंगलात फेकून दिला. पोलिसांनी संशयाच्या आधारावर रंजीतला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. रंजीत हा मूळचा बिहारमधील सहरसा जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या प्रेमनगरमधील भट्टोवाला येथे मजूर म्हणून काम करत होता.
हे ही वाचा : शौचालयाच्या छतावर आढळला तरुणाचा विवस्त्र मृतदेह, हातात कंडोमचे पाकीट अन्.., धक्कादायक प्रकरण
पोलीस पथकाचा गौरव आणि बक्षीस
अत्यंत गुंतागुंतीच्या असलेल्या या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयजी राजीव स्वरूप आणि एसएसपी प्रमेन्द्र डोबाल यांनी तपास पथकाच्या चिकाटीवर समाधान व्यक्त केले असून, संपूर्ण टीमला रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे. एका बेवारस मृतदेहापासून सुरू झालेला हा तपास एका नराधम पतीला गजाआड करून थांबला आहे. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून पोलिसांच्या या कामगिरीची चर्चा सध्या संपूर्ण शहरात रंगली आहे.
ADVERTISEMENT











