Crime News : एका कारखान्यातून अल्पवयीन मुलांसह 12 मजुरांची पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे. या मजुरांना गेल्या अनेक महिन्यांपासून डांबून ठेवून, दिवसातून तब्बल 20-20 तास काम करण्यास भाग पाडले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांना प्रचंड मारहाण करून गुरांच्या खाद्यापासून (कोंड्यापासून) बनवलेल्या सुक्या भाकरी खायला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, या नरकयातनेतून एका मजुराने कसाबसा स्वतःचा जीव वाचवून पळ काढला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्याच्या तक्रारीनंतर पोलिस आणि कामगार विभागाने तात्काळ कारखान्यावर छापा टाकून या 12 मजुरांची सुटका केली. सुटकेनंतर पोलिसांनी सर्वप्रथम भावूक झालेल्या या मजुरांना पोलिस ठाण्यात जेवण दिले. या प्रकरणी कारखान्याचा सुपरवायझर शिवा त्यागी याला अटक करण्यात आली असून, मुख्य मालक अंकित बालियान सध्या फरार आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील ही घटना आहे. वेठबिगारीच्या या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भारतात 1976 मध्ये कायदा करुन वेठबिगारीवर बंदी घालण्यात आली आहे.
मजुराचा छळ करून खून
या प्रकरणात आणखी एक थरकाप उडवणारा खुलासा मजुरांनी केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर (2025) मध्ये अर्जुन ऊर्फ 'टोपी' नावाच्या एका नेपाळी मजुराचा कारखान्यात अमानुष छळ करून खून करण्यात आला होता, असा आरोप मजुरांनी केला आहे. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून गायब करण्यात आला. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा नवा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मजुरांनी सांगितले की, कारखान्यात भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी मालक भिंतीवर पिस्तुलमधून गोळ्या झाडायचा आणि 'कोणाला काही सांगितले तर तुमचीही हिच अवस्था करू' अशी धमकी द्यायचा.
हे ही वाचा : 40 दिवसांपूर्वी लग्न, नवविवाहितेचा भयंकर शेवट, नेमकं काय घडलं?
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
सुटका करण्यात आलेल्या मजुरांनी सांगितले की, त्यांना रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरून गाठण्यात आले होते. दरमहा 12,000 ते 15,000 रुपये पगार, राहण्याची-खाण्याची सोय आणि फक्त 8 तास काम करण्याचे आमिष दाखवून त्यांना येथे आणले गेले. मात्र, कारखान्यात पाऊल ठेवताच दुसऱ्याच दिवसापासून त्यांचे मोबाईल आणि ओळखपत्रे काढून घेण्यात आली. त्यांना मुख्य दरवाजाला कुलूप लावून आतमध्ये कैद करण्यात आले. एका मजुराने सांगितले की, त्यांचे काम पहाटे 4 वाजल्यापासून सुरू व्हायचे ते थेट मध्यरात्रीपर्यंत चालायचे. दिवसातून जेमतेम 2 ते 3 तास झोप मिळायची. कोणी आजारी पडले तरी सुट्टी दिली जात नव्हती.
हे ही वाचा : 'तिला पण लोहगडावरुन ढकला' सियाच्या आई-वडिलांची हॉस्पिटलमधून मुलाखत
पिटबुल कुत्रे आणि सीसीटीव्हीचा पहारा
हा कारखाना म्हणजे एक प्रकारे अभेद्य तुरुंग बनवण्यात आला होता. मजुरांनी सांगितले की, कारखान्याला अत्यंत उंच भिंती होत्या, जागोजागी कुलूपबंद दरवाजे आणि आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच मजूर पळून जाऊ नयेत म्हणून तिथे हिंस्त्र 'पिटबुल' प्रजातीचे कुत्रे सोडण्यात आले होते. एका मजुराने सांगितले, "कुत्र्यांना दूध आणि मांस खायला दिले जायचे, पण आम्हाला मात्र सुक्या भाकऱ्या दिल्या जात होत्या." मजुरांच्या पाठीवर, कमरेवर आणि पायावर मारहाणीचे गंभीर व्रण आहेत. त्यांना बेल्ट, लाठ्या आणि भाल्यासारख्या टोकदार शस्त्रांनी टोचून जखमी करण्यात आले होते, तसेच कुत्र्यांकडूनही चावा घ्यायला लावला होता.
हे ही वाचा : Pune Metro : मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन
पुनर्वसन आणि पुढील कारवाई
सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 12 मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मजुरांना झालेल्या प्रचंड मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन (Psychiatric Counselling) केले जात आहे. सुटका झालेल्यांपैकी 4 मजुरांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले असून इतरांच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. कामगार विभागामार्फत 'बंधक मजूर पुनर्वसन योजने'अंतर्गत (Bonded Labour Rehabilitation Scheme) सर्व मजुरांना तातडीची आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच ज्या मजुरांचे बँक खाते नाही, त्यांचे खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फरार कारखाना मालकाला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक कसून शोध घेत आहे.
ADVERTISEMENT











