Lok Sabha Elections 2024 : भाजपची आणखी एका पक्षासोबत युतीची चर्चा फिस्कटली!

मुंबई तक

26 Mar 2024 (अपडेटेड: 26 Mar 2024, 12:35 PM)

BJP SAD Alliance : भाजपने पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, शिरोमणी अकाली दलासोबत युतीबाबत चर्चा फिस्कटली आहे.

भाजपने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबमध्ये भाजप-शिरोमणी अकाली दल स्वतंत्रपणे लढणार, हे स्पष्ट झाले आहे.

follow google news

BJP Breaks Alliance with SAD : ओडिशामध्ये बीजेडीसोबतची युती फिस्कटल्यानंतर भाजपने एनडीएतील आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे. पंजाबमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिरोमणी अकाली दलासोबतची भाजपची युती संपुष्टात आली आहे. 

हे वाचलं का?

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये स्वबळाव लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिरोमणी अकाली दलाशी युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. राज्यातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या मतांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे जाखड म्हणाले. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपावरुन भाजप आणि शिरोमणी अकाली दलात मतभेद होते, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होऊ शकली नाही. अकाली दलाने 9 जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि उर्वरित चार जागा भाजपला देण्याची ऑफर दिली होती. तथापि, भाजपने जागावाटपात मोठा वाटा मागितला होता.

2019 मध्ये युतीत लढवली होती निवडणूक

शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग म्हणून भाजपसोबत पंजाबमध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही पक्षांना फारसे चांगले यश मिळाले नाही. काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. गुरुदासपूर आणि होशियारपूरच्या जागा भाजपच्या वाट्याला गेल्या होत्या. अकाली दलाने फिरोजपूर आणि भटिंडा या जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्षाने संगरूरची जागा जिंकली होती.

तीन कृषी कायद्यामुळे भाजपची सोडली होती साथ

केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाने सप्टेंबर 2020 मध्ये भाजपशी संबंध तोडले. शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधानंतर मोदी सरकारने तिन्ही कायदे मागे घेतले होते. 

सुनील जाखड म्हणाले की, "पंजाबमधील तरुण, शेतकरी, व्यापारी, मजूर आणि सर्वांच्या भवितव्यासाठी भाजपने राज्यात एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात पंजाबमध्ये जे काम झाले आहे ते इतर कोणी केले नाही."

हेही वाचा >> नाशिकमधून भुजबळ निवडणुकीच्या मैदानात?

एमएसपी कायद्याची मागणी करत शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. यावर सुनील जाखड म्हणाले की, "केंद्र सरकारने ज्या पिकांवर एमएसपी जाहीर केला आहे, त्या सर्व पिकांची एमएसपीनुसार खरेदी केली जात असून, काही आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचत आहेत."

"पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, "कर्तारपूर कॉरिडॉर, ज्यासाठी लोक अनेक दशकांपासून विनंती करत होते, ते केवळ वाहेगुरूंच्या आशीर्वादाने पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाले."

हेही वाचा >> घराणेशाही, राजकीय समीकरणे! 'या' जागा महायुती-मविआसाठी डोकेदुखी का ठरल्यात?

"कर्तारपूर कॉरिडॉर भारतातील शीख बांधवांना सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला व्हिसा-मुक्त 'दर्शन' घेता येत आहे. पंजाबच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला", असे सुनील जाखड म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबची जनता भाजपला मतदान करून देशाच्या प्रगतीला साथ देईल, असा मला विश्वास आहे.

    follow whatsapp