Amol Kirtikar : "घोटाळेबाज, लाचखोर", काँग्रेस नेत्याचेच गंभीर आरोप, ठाकरेंचा उमेदवार वादात

ऋत्विक भालेकर

10 Mar 2024 (अपडेटेड: 10 Mar 2024, 12:23 PM)

North West Mumbai Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली.

follow google news

Amol Kirtikar Sanjay Nirupam : महाविकास आघाडीचे जागावाटप होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने वादाची पहिली ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी थेट अमोल कीर्तीकर यांना घोटाळेबाज म्हटले आहे. (Congress Leader Sanjay Nirupam Targets Shiv Sena UBT Candidate's Amol Kirtikar)

हे वाचलं का?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरुपम हे इच्छुक आहेत. ते यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी जागावाटप निश्चित होण्यापूर्वीच उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याने संजय निरुपम नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी व्यक्त करताना त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. 

संजय निरुपम यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी

निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, "काल सायंकाळी शिल्लक राहिलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली."

"रात्रीपासूनच फोन येत आहेत. असे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझनाहून जास्त बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. ज्या ८-९ जागांचा पेच आहे, त्यात हा मतदारसंघही  आहे, असे मला काँग्रेसच्या त्या सहकाऱ्यांनी सांगितले, जे जागावाटपाच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत."

हेही वाचा >> "तुमचा नवरा मोदी-मोदी करत असेल, तर त्याला जेवण देऊ नका"

"मग शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा करणे आघाडी धर्माचं उल्लंघन नाहीये का? की काँग्रेसला कमी लेखण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट केली जात आहे? काँग्रेस पक्षश्रेष्ठीने यात हस्तक्षेप करायला हवा."

"शिवसेनेच्या वतीने ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तो कोण आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे."

"खिचडी घोटाळा काय आहे? कोविड काळात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने मोफत जेवण उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य कार्यक्रम होता. गरिबांना जेवण देण्याच्या योजनेत शिवसेनेच्या घोषित झालेल्या उमेदवाराने कमिशन घेतलं आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे."

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं लगेच उत्तर; फडणवीसांसमोर काय घडलं?

"अशा घोटाळेबाज उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते प्रचार करणार का? असा प्रश्न माझा दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाला आहे", असे म्हणत संजय निरुपम यांनी त्यांची खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे ठाकरेंनी घोषित केलेला पहिलाच उमेदवार वादात सापडला आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच हे आरोप केल्याने विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले आहे. 

    follow whatsapp