‘जोडे मारायची ही पद्धत सुरू झाली, तर…’, अजित पवार चिडले, फडणवीसही झाले आक्रमक

मुंबई तक

23 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:55 AM)

Ajit Pawar gets angry on bjp mla’s protest in assembly area: राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी आज विधानसभेत गदारोळ केला. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप-शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Mumbaitak
follow google news

Ajit Pawar gets angry on bjp mla’s protest in assembly area: राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी आज विधानसभेत गदारोळ केला. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप-शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. अजित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. पवारांच्या भूमिकेला समर्थन देत फडणवीसांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं.

हे वाचलं का?

भाजप-शिवसेना आमदारांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी केली. त्यावरून गदारोळ सुरू असतानाच अजित पवारांनी सुनावलं. अजित पवार म्हणाले, “अधिवेशन व्यवस्थित चालावं असा आम्ही सतत प्रयत्न करतोय. मदत पण करतोय. आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित चाललेलं होतं. आज सकाळी 11 वाजता पूर्वी आपल्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे काही सदस्य एक बोर्ड घेऊन बसलेले होते. त्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो होता. त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळाचं कार्यक्षेत्र जे अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिकार क्षेत्रात येतं, त्या परिसरात या गोष्टी सुरू होत्या.”

…तर कुणालाच ते आवडणार नाही, अजित पवार भडकले

“अध्यक्षांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मला एक सांगायचं आहे की, त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून घडली. उद्या विरोधी पक्षाकडून देखील, वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुम्हालाही तुमच्या पक्षाच्या काही नेत्यांबद्दल अभिमान आहे. तसाच आम्हालाही आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल आदर आहे. जोडे मारायची ही पद्धत सुरू झाली, तर उद्या दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले, तर कुणालाच ते आवडणार नाही.”

Modi Surname case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; ‘मोदी’ प्रकरण काय?

विधिमंडळ परिसरात असं घडता कामा नये -अजित पवार

“आम्हालाही ते पटणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थिती विधिमंडळाच्या परिसरात कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडून घडू नये. ते घडू नये म्हणून अध्यक्षांनी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलली पाहिजेत. जोडे मारण्याची जी घटना घडली, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही. रोडवर लोक काय करतात, हा ज्याचा त्यांचा प्रश्न असतो. परंतु विधिमंडळ परिसरात असं घडता कामा नये, अशी आमची मागणी आहे”, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलं, ते योग्य आहे. विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारे जोडे मारणे करू नये. याबाबतीत मी सहमत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सर्व सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन, यापुढे होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल.”

“सावरकरांबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा निषेध झाला पाहिजे. आम्ही त्याचा निषेध करतो. मी सत्तारुढ पक्षाच्या वतीने अध्यक्षांना आश्वस्त करतो की, अशा प्रकारे सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही. हे योग्य नाही. यासाठी सभागृहाचं आवार नाही. समोरच्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की, या देशाच्या स्वातंत्र्यावीरांविरुद्ध अशा प्रकारचं त्यांनी बोलणं चुकीचं आहे. या सभागृहात दोन्ही बाजूने जे बोलले गेले, त्यात काही चुकीचे असेल, तर तपासून घ्यावे आणि चुकीचे असेल, तर काढून टाकावं”, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना केली.

“उपमुख्यमंत्री ‘होयबा’ अंध भक्त”, शिवसेनेनं (UBT) फडणवीसांवर डागली तोफ

हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का? फडणवीसांचा पलटवार

“त्याचवेळी या देशाचे सुपुत्र, खऱ्या अर्थाने क्रांतिकारकाचे स्फुर्तीस्थान असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने जे काही बोललं जातंय, ते बोलणं देखील बंद केलं पाहिजे. कारण सावरकरांनी जे भोगलं आहे, ते कुणीच भोगलेलं नाहीये. 11 वर्ष तोलूचा बैल बनवून सावरकर आंदमानच्या कारागृहात अनन्वित अत्याचार सहन करत होते, तरीही वंदे मातरम म्हणत होते. भारत माता की जय म्हणत होते. अनेक लोक मृत्युमुखी पडेल, अनेकजण वेडे झाले. पण, सावरकरांनी सहन करत संघर्ष केला. त्यामुळे भगतसिंगांनी सावरकरांनी छापलेले आत्मचरित्र मॅझिनीचे, ते वाटण्याचे काम केले. हे इतिहासात नमूद आहे. हे कोण आलेत, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का?”, असा सवाल फडणवीसांनी केला.

    follow whatsapp