पोलिसांच्या गोळीबारात मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची सूत्रांची माहिती, एकूण 26 नक्षल्यांना कंठस्नान

मुंबई तक

• 05:27 PM • 13 Nov 2021

नक्षलविरोधी करणाऱ्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 26 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस विभागाने अद्याप याबाबतची माहिती दिलेली नाही. या मोहिमेत सकाळपासून कारवाई सुरू होती. सुरूवातीला पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यानंतर आत्तापर्यंत एकूण 26 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पोलिसांनी गेल्या काही […]

Mumbaitak
follow google news

नक्षलविरोधी करणाऱ्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 26 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस विभागाने अद्याप याबाबतची माहिती दिलेली नाही. या मोहिमेत सकाळपासून कारवाई सुरू होती. सुरूवातीला पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यानंतर आत्तापर्यंत एकूण 26 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

हे वाचलं का?

गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मूळचा वणी येथील असून तो गेल्या काही वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. नक्षल्यांना सोपा रस्ता कोणता आहे आणि नक्षली नेत्यांसाठी सुरक्षित ठिकाण कोणतं असू शकतं हे शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद तेलतुंबडेने विस्तार दलम नावाच्या कमांडो युनिटमध्ये 200 लोकांची भरती केली होती.

दरम्यान जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी आणि संदीप दीपकराम यांना ठार करण्यात आलं आहे. मात्र पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला – रानकट्टा जंगल परिसरात आज सकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. विशेष म्हणजे रानकट्टा हे गाव गडचिरोली जिल्ह्यात असून हिंडकोटोला हे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी होत्या. घटनेनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातून जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. आतापर्यंत 26 नक्षलवाचे प्रेत सापडले असून घटनास्थळी आताही सर्चींग ऑपरेशन सुरू आहे.

कोण आहेत सी-60 कमांडो?

गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.

काय म्हणाले आहेत गृहमंत्री?

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.

“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

    follow whatsapp