बेळगाव, निपाणी, कारवार हा आमचाच भाग : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचं उत्तर

मुंबई तक

• 03:19 PM • 24 Nov 2022

मुंबई : बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा भाग आम्हाला निश्चित परत मिळेल. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही.

केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकमध्येही भाजपचं सरकार असल्यानं आता या मागण्या केल्या जात आहेत, या आरोपांवर फडणवीस म्हणाले, या पूर्वी सर्वात जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात देखील काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. मात्र आता सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

काय म्हणाले होते बसवराज बोम्मई :

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनीच कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे.

2004 पासून महाराष्ट्र सरकारनं सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. पण आतापर्यंत याला यश आले नाही आणि यापुढे ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा :

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा विचार कर्नाटक सरकार करत असल्याचं विधान काल बोम्मईंनी केलं. बसवराज बोम्मई म्हणाले, “सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केलेला आहे. या तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. कर्नाटकात सामील होण्याच्या जत तालुक्याच्या ठरावावर आम्ही गंभीरपणे विचार करीत आहोत, असं ते म्हणाले होते.

फडणीवस काय म्हणाले होते :

बोम्मई यांच्या या विधानावर काल फडणवीस म्हणाले होते, सीमाप्रश्नी आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर, त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. एक नक्की सांगतो की, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडून बेळगाव – कारवार – निपाणीसह आमची गावे मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एकाच देशात राहतो. त्यामुळे शत्रूत्त्व नसले तरी कायदेशीर लढा मात्र आहेच.

    follow whatsapp