‘…त्यावेळी तुम्ही जनतेच्या भावना भडकावल्या असत्या का?’; केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई तक

25 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उलट सवाल केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दीपक केसरकर यांनी टीकास्त्र डागलं. दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे “आज भावना भडकावल्या जात आहेत, त्या कितपत योग्य आहे, याचा विचार करा. कारण आज जे मुख्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उलट सवाल केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दीपक केसरकर यांनी टीकास्त्र डागलं.

हे वाचलं का?

दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

“आज भावना भडकावल्या जात आहेत, त्या कितपत योग्य आहे, याचा विचार करा. कारण आज जे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना तुमच्या पक्षप्रमुखांनीच मुख्यमंत्री करतो असं आश्वासन दिलं होतं. बाळासाहेब दिलेलं आश्वासन पुर्ण करायचे. पण इथे दिलेलं आश्वासन पूर्ण केलंच नाही. उलट ते (एकनाथ शिंदे) स्वतः तुमच्याकडे आले (उद्धव ठाकरे) आणि तुम्हीच मुख्यमंत्री रहा असं सांगितलं.”

“जर मोदींबरोबर बोलणी सुरू होती, तर त्या परिस्थितीतही तुम्हाला त्या पदावरून उतरावंच लागलं असतं. जरी अडीच वर्षांचा फॉर्म्युला होता. त्यामुळे अडीच वर्षानंतर पदावरून उतरावं लागलं असतं. त्यावेळी तुम्ही जनतेच्या भावना भडकावल्या असत्या का हा प्रश्न आहे.”

“राज्याला शांतता हवी आहे. राज्याला शांतता द्यायची की नाही, याचाही विचार केला पाहिजे. २०१४ साली आमचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी रोज सकाळी पत्रकार परिषदे असायची. रोज दिल्लीवर टीका असायची, इथं राज्य व्यवस्थित चालावं अशी तुम्ही अपेक्षा करत होतात. मग ते घडत नव्हतं. त्याला जबाबदार कोण होतं? रोज सकाळी ९ वाजता कोण बोलत, हे महाराष्ट्राला माहितीये.”

“केंद्र राज्याचे संबंध चांगले राहिले, तर राज्याचा गाडा चांगला चालू शकतो. राजकीय पक्ष जनतेसाठी, राज्यासाठी असतात. आज जी परिस्थिती निर्माण झालीये. तर आज तुम्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पंचनामे करायला का मदत करीत नाही. त्याऐवजी महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. आमच्या खासदाराच्या घरावर मोर्चा काढला.”

“आजारी असताना कटकारस्थान केलं नाही. आम्ही येऊन भेटतो होतो. आघाडी तोडा, असं सांगत होतो. शिवसेना वाचावी म्हणून ही आघाडी राहू नये असं आम्हाला वाटतं होतं. मुंबई ही ह्रदय आहे, असं तुम्हाला वाटतं, तर त्यावेळी मोदींशी बोलणी का केली नाही. मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी म्हणून.”

“आज तुम्ही मुंबईमध्ये दिसायला लागला आहात. आज तुम्ही शाखांमध्ये फिरायला लागला आहात. कालपर्यंत हे कुठे फिरत नव्हते. हे युवा सेनेचे प्रमुख आहेत, त्यांचं नाव मला घ्यायचं नाही कारण मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते लोकांना दिसतही नव्हते. सातव्या मजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. किती काळ ते ऑफिसमध्ये गेले. किती लोकांना भेटले?”

“आमच्या आमदारांना जाऊन तुम्ही चिडवता. त्यांच्या विरोधात लोकांना उठवता. त्यावेळी तुम्ही किती शिवसैनिकांना भेटलात, तुम्ही महाराष्ट्राच्या किती जनतेला भेटलात, याचसुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. आम्ही मंत्री असताना सात वाजता घरचं ऑफिस सुरू करतो. दहा वाजता कार्यालयात जातो. याच्यासाठी आम्हाला कार्यालये दिलेली असतात.”

“देशातील पहिल्या क्रमांकांचं राज्य महाराष्ट्र आहे. तुम्ही तुमच्या पक्षात काय करायचं, तुम्ही तुमचे कार्यकर्ते कसे जवळ ठेवायचे हा तुमचा विषय आहे. त्यामध्ये जनतेला ओढू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत. मग आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यामध्ये तुमचं स्वतःचं योगदान काय देणार? हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा कुटुंबावर दुःख कोसळत हे लोकांना माहितीये.”

“आज राजकारण करण्याची वेळ नाही. राजकारणात अडीच वर्ष गेली आहेत. त्यामुळे कामाच्या बाबतीत राज्य मागं पडतं. तुम्ही राजकारण करा. तुम्ही मुलाखती द्या. त्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही. आता हे थांबलं पाहिजे. तुम्ही न्यायालयात गेला असाल, तर तिथे निर्णय होईल. निवडणूक आयोगाकडे गेला असाल, तर निर्णय होईल.”

    follow whatsapp