राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आदिवासी संमेलनात मोदींनी आदिवासी समाजाचा उल्लेख वनवासी असा केला होता असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर मोदी काय म्हणाले होते तो व्हीडिओही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे. शरद पवार यांचं ट्विटही त्यांनी जोडलं आहे आणि त्याला व्हीडिओ जोडत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
शरद पवारजी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते?
‘आज देशाची सूत्रे भाजपाकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही.’
शरद पवार यांनी केली पंतप्रधान मोदींवर टीका
धार्मिक तेढ आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सत्ताधारी करत आहेत. त्रिपुरात काही घडलं त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. नांदेड, अमरावती, मालेगाव या ठिकाणी याचे परिणाम झाले. तिथं काही घडलं तर त्याची किंमत इथल्या लोकांना का द्यावी लागावी? ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्या पक्षाच्या लोकांची एकंदर भूमिका या सर्व परिस्थिती तेल ओतून आग वाढवण्याची होती. याचा अनुभव अमरावतीत घेता आला. त्यामुळे सांप्रदायिक विचार, जातीयवादी विचार, दोन समाजांमध्ये अंतर आणि द्वेष वाढवण्याचा विचार करणाऱ्यांना खड्याप्रमाणे बाजूला करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास दहा टक्के असूनही, दशकांपर्यंत जनजातीय समाजाला त्यांची संस्कृती त्यांच्या सामर्थ्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं गेलं. आदिवासींचं दुःख, त्यांच्या यातना, मुलांचे शिक्षण, आदिवासींचं आरोग्य त्या लोकांसाठी काहीच महत्वाच नव्हतं. मित्रांनो भारताच्या सांस्कृतिक यात्रेत जनजातीय समाजाचं योगदान अतूट राहीलं आहे. तुम्हीच सांगा, जनजातीय समाजाच्या योगदानाशिवाय प्रभू रामाच्या जीवनात यशाची कल्पना केली जाऊ शकते का? कधीच नाही. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत हे व्हीडिओत दिसतं आहे.
ADVERTISEMENT