Cyrus Mistry : गाडीला सुरक्षेचे 5 स्टार रेटिंग, 7 एअर बॅग… तरीही अपघातात गमावला जीव

मुंबई तक

• 01:28 PM • 04 Sep 2022

पालघर : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं, ते 54 वर्षांचे होते. रविवारी (4 सप्टेंबर) दुपारी पालघरजवळील चारोटी गावाजवळ हा अपघात झाला. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान अहमदाबाद-मुंबई महामार्गावरून मर्सिडीज गाडीने (MH-47-AB-6705) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सुर्या नदीच्या पुलावर त्यांची […]

Mumbaitak
follow google news

पालघर : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं, ते 54 वर्षांचे होते. रविवारी (4 सप्टेंबर) दुपारी पालघरजवळील चारोटी गावाजवळ हा अपघात झाला. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान अहमदाबाद-मुंबई महामार्गावरून मर्सिडीज गाडीने (MH-47-AB-6705) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सुर्या नदीच्या पुलावर त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.

हे वाचलं का?

दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अपघाताबाबत समाजमाध्यमांवर प्रश्न विचारले जावू लागले आहेत. सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला की घातपात? अशा शंका उपस्थित होवू लागताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पालघरजवळ झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

सायरस मिस्त्री यांची गाडी सुरक्षित प्रवासासाठी ओळखले जाते :

सायरस मिस्त्री यांची अपघातग्रस्त मर्सिडीज बेंझ GLC 220d ही गाडी सर्वात महागडी आहे, तसेच अत्यंत सुरक्षित प्रवासासाठी ही गाडी ओळखली जाते. सुरक्षेच्या बाबतीत 5 Star (Euro NCAP) रेटिंगसह, 7 एअर बॅग, हाय बीम असेट, सीट बेल्ट वॉर्निंग, ओव्हर स्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सर डोअर लॉक अशी अनेक सुरक्षा साधने प्रदान केली आहेत.

मर्सिडीजने अतिरिक्त रस्ता सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार-टू-एक्स फंक्शन देखील अपग्रेड केले आहे. ते आता EQS मध्ये देखील उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून ऑडिबल मॅसेजद्वारे ड्रायव्हरला खड्डे, स्पीड बंप यांसारख्या धोक्याच्या सूचना आधीच देऊन सावध करता येते.

अपघात झाला त्यावेळी कारमधील समोरच्या एअर बॅग उघडलेल्या दिसत आहेत. मात्र, तरीही मिस्त्री यांचा जीव कसा गेला असा सवाल उपस्थित होतं आहे. याशिवाय अहमदाबाद ते मुंबई असा जवळपास ५२३ किलोमीटरचा प्रवास इतके मोठे उद्योगपती रस्त्याने करतात याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच सर्व शंका आणि प्रश्नांची दखल घेवून गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp