राज्यात परतीच्या पावसाने आपला मार्ग पकडला असून गेल्या तीन-चार दिवसांपासून या पावसाचा परिणाम राज्यभरात दिसतो आहे. राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून अहमदनगर आणि बीडला पावसाने झोडपलं आहे.
ADVERTISEMENT
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज दुपारी दोन वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास पडत असलेल्या या पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचं रुप आलं होतं. अनेक दुकानं आणि घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरलं. तसेच अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्याही पाण्यात बुडाल्या. तिकडे बीडमध्ये अंबाजोगाईच्या पाटोदा भागातही अतिवृष्टी पहायला मिळाली.
या पावसामुळे पुलावरुन पाणी वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली तर सोयाबीनचे ढिग पाण्याखाली वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पाटोद्यात दुपारी तीन वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली, ज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कुंबेफळ, दैठणा, राडी या गावातील पुलावरुन पाणी वाहायला लागल्यामुळे वाहतूक काहीकाळासाठी ठप्प झाली.
पुढील चार तासांत मुसळधार! पुण्यासह राज्यातील ‘या’ भागांना इशारा
काही भागांत तयार झालेलं सोयाबीन काढण्याची तयारी सुरु होती, परंतू या पावसामुळे शेतांमध्ये अक्षरशः तळ निर्माण झालं होतं. शेतातले शेतकरी, शेतमजूरही या पावसामुळे अडकून राहिले. याआधीच चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मराठवाड्याला आता परतीच्या पावसानेही धुवून काढलं आहे. या नुकसानातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
