तुर्तास लोडशेंडिगचा ‘शॉक’ नाही; राज्यात तीन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा

मुंबई तक

• 11:45 AM • 12 Oct 2021

गेल्या काही दिवसांपासून देशात कोळसा टंचाईची चर्चा असून, राज्यालाही कोळसाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी केला जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. कोळसा टंचाई आणि वीज तुटवड्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परिस्थितीची माहिती दिली. यावेळी बोलताना महाराष्ट्रात लोडशेडिंग केलं जाणार नाही, अशी ग्वाही राऊत यांनी दिली. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कोळसा टंचाई […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून देशात कोळसा टंचाईची चर्चा असून, राज्यालाही कोळसाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी केला जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. कोळसा टंचाई आणि वीज तुटवड्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परिस्थितीची माहिती दिली. यावेळी बोलताना महाराष्ट्रात लोडशेडिंग केलं जाणार नाही, अशी ग्वाही राऊत यांनी दिली.

हे वाचलं का?

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कोळसा टंचाई आणि भारनियमाबद्दल माहिती दिली. ‘कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली आहे. गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून, वीज निर्मिती वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, असं ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हणाले.

‘राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा, यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्याशी नियमित संपर्कात असून, लवकरच या संकटावर आम्ही मात करू’, अशी माहिती नितीन राऊत यांनी यावेळी दिली.

‘या पार्श्वभूमीवर मी सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो की सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळ व संध्याकाळी ६ ते १० या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करावे’, असं आवाहन ऊर्जामंत्र्यांनी यावेळी केले.

‘महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १३ हजार १८६ मेगावॅट आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही महावितरण वीज खरेदी करीत असते. कोळसा टंचाईमुळे चार आणि देखभाल दुरूस्तीमुळे तीन असे सात संच बंद असल्याने राज्याला तीन हजार मेगावॅट वीजेची तूट जाणवू लागली आहे’, अशी माहितीही ऊर्जामंत्र्यांनी दिली.

‘महानिर्मितीने कोळसा आणि वीज उत्पादन व्यवस्थापनात उत्तम समन्वय आणि संतुलन राखल्याने कोळशाची आवक वाढली आणि वीज उत्पादन वाढवून सुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा होत आहे. साधारणपणे पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबरपर्यंत विजेची मागणीत घट होत असते. परंतु, ऑगस्ट महिन्यात विजेची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी १८ लाख मेट्रिक टन कोळशाचा साठा वापरावा लागला’, असंही ते म्हणाले.

    follow whatsapp