Maharashtra Rain: राज्यात पावसाची दमदार बॅटिंग, पालघर, पुणे आणि गडचिरोलीत रेड अलर्ट

मुंबई तक

• 01:34 PM • 12 Jul 2022

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. २९ जूनपर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर, पुणे, गडचिरोली या ठिकाणी आणखी दोन दिवस अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आला आहे. तसंच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. २९ जूनपर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर, पुणे, गडचिरोली या ठिकाणी आणखी दोन दिवस अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आला आहे. तसंच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असंही सांगण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

मुंबई, पुणे, पालघर, गडचिरोलीसह महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता : हवामान विभाग

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार १२ ते १४ जुलै या कालावधीत पालघर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आज दुपारी 12 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून 5992 क्युसेक करण्यात येत आहे.

गडचिरोलीत दोन दिवस रेड अलर्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. १२ आणि १३ जुलै असे दोन दिवस या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच पुढच्या ४८ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. काहीशा थांबून सरी कोसळत असल्या तरीही पाऊस चांगला पडतो आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाणी साचलेल्या भागात वाहतुकीचा वेग मंदावला. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा रेल्वे सेवेवर गंभीर म्हणावा असा परिणाम झालेला नाही.

मराठवाड्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी पावसाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.

    follow whatsapp