महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ पाहिल्यानंतर मध्यावधी निवडणुका होतील असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सगळेच सांगत आहेत. इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी महाराष्ट्रातल्या या घडामोडी, बिहारमध्ये झालेला राजकीय भूकंप, देशातलं राजकारण या सगळ्याबाबत एक सर्व्हे केला आहे. लोकसभेच्या निवडणुकाच जर आज घेतल्या गेल्या तर काय होईल? असा प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आला. त्यावर लोकांनी काय मत व्यक्त केलं आहे जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल? काय म्हणत आहेत लोक?
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल हा प्रश्न बिहारमधल्या राजकीय भूकंपाच्या आधी विचारण्यात आला तेव्हा लोकांनी महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. जर आज घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला 307 जागा मिळतील असं मत लोकांनी नोंदवलं आहे. तर UPA ला 125 जागा मिळतील असं मत नोंदवलं आहे.
बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी जो राजकीय भूकंप झाला तो सगळ्या देशाने पाहिला. नितीश कुमार यांनी भाजपपासून काडीमोड घेत राजद आणि काँग्रेसोबत जात आठव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपकडून सातत्याने त्रास दिला जातो आहे असा आरोप नितीश कुमार यांनी केला. तसंच तेजस्वी यादव आणि काँग्रेसला सोबत घेत शपथ घेतली. बिहारमध्ये जे घडलं त्यानंतर आम्ही एनडीए आणि युपीएबाबत पुन्हा तोच प्रश्न विचारला.
बिहारच्या सत्तानाट्यानंतर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल?
या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिलं आहे. बिहार सत्तानाट्यानंतर लोक म्हणत आहेत की एनडीएला २८६ जागा मिळतील आणि युपीएला १४६ जागा मिळतील असं म्हटलं आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये भाजपची सत्ता अबाधित राहते आहे असंच लोकांचं म्हणणं आहे. बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याचा किंचित परिणाम लोकसभेच्या निवडणुका आज घेतल्या तर होऊ शकतो असं लोकांना वाटतं आहे.
महाराष्ट्राबाबत धक्कादायक निकाल येऊ शकतात
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात काय स्थिती असेल असा प्रश्न विचारण्यात आला होतात. त्यावर लोकांनी धक्कादायक संख्या नोंदवली आहे. आज घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर एनडीनएला १८ जागा आणि युपीएला ३० जागा मिळतील असं लोकांना वाटतं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आज घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर ही परिस्थिती येईल असं लोकांना वाटतं आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४८ जागा आहेत. त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील असं मत लोकांनी नोंदवलं आहे.
ADVERTISEMENT