Rain Live updates : निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सिंधुदुर्ग 27 गावांचा संपर्क तुटला

मुंबई तक

• 06:58 PM • 05 Jul 2022

जून महिन्यात ओढ दिल्यानंतर अखेर राज्यात पावसाला सुरूवात झालीये. मुंबई, नागपूर, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागात पावसाची संतत’धार’ सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशार देण्यात आलाय. त्यामुळे कोकणातील काही भागांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचा वाढता जोर आणि नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे […]

mumbaitak

mumbaitak

follow google news
जून महिन्यात ओढ दिल्यानंतर अखेर राज्यात पावसाला सुरूवात झालीये. मुंबई, नागपूर, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागात पावसाची संतत’धार’ सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशार देण्यात आलाय. त्यामुळे कोकणातील काही भागांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचा वाढता जोर आणि नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईसह पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Heavy Rain alert in Maharashtra : राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

हे वाचलं का?

चिपळूणमध्ये एनडीआरएफची तुकडी

गेल्यावर्षी चिपळुणमध्ये महापुराने हाहाकार उडाला होता. शहरात पाणी शिरल्याने घरं पाण्याखाली गेली होती. शहरातील अनेक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं. यात प्रचंड नुकसान झालं होतं. सध्या चिपळूणमध्ये पाऊस कोसळत असून, पुराचा धोका सध्यातरी दिसत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने एनडीआरएफची तुकडी तैनात केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं धुमशान! 4 नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, परशुराम घाट बंदच

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ‘कहर’!

कोकणात पावसाने अक्षरशःधुमाकूळच घातला आहे. मागील २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू असून, नद्या, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. निर्मला नदीपात्रात पाण्याचा ओघ वाढला असून, नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील आंबेरी पूल पाण्याखाली गेला असून, त्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक प्रवासी व शाळकरी विद्यार्थी अडकून पडले आहेत. माणगाव खोऱ्यात तुफान पाऊस सुरू असून, एसटीसह इतर वाहतूक बंद झाली आहे.

नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी सब-वे जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहनांना आणि नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत.

पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठी वाढ वाढली

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पात्रात येणारा पाण्याचा ओघ वाढला असून, नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेचं नदीपात्रातील पाणीपातळी २५ फूटांवर पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी ३९ फूट असून, धोका पातळी ४३ फूटांवर आहे. त्यामुळे पाण्याचा जोर कायम राहिल्यास लवकरच इशारा पातळी गाठण्याची भीती आहे. सध्या १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. जिल्ह्यातील तिवसा शहरात पिंगळाई नदीला पूर आला असून, आठवडी बाजारात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं जात आहे. तिवसा येथे ३० ते ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून, नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

शाळेत शिरलं पाणी, विद्यार्थ्यांना सुट्टी

मुंबईत सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असून, अनेक सखल भागात पाणी साचू लागलं आहे. कुर्ला भागातही अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, कुर्ल्यातील नेहरू नगरातील एस. के.. पंतवाळवलकर इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर सुट्टी देण्यात आली.

गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळली दरड

गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना सोमवारी सायंकाळी घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक संध्याकाळपासूनच बंद करण्यात आलेली आहे.पर्यायी मार्ग म्हणून चिरणी- कळंबस्ते मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आली आहे. त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून, दरडीची माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सातत्याने सुरू झाले आहेत.

कोल्हापुरला तडाखा, पंचगंगेची पाणीपातळी वाढली

राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही धो धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पात्रातील पाण्याचा ओघ वाढला असून, कसबा बावडा, राजाराम बंधारा याठिकाणील रस्ते वाहतूक सोमवारी (४ जून) रात्रीपासून बंद करण्यात आलीये. मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल नऊ फूट इतकी वाढ झाली आहे.

राज्याची उपराजधानी नागपुरातही सोमवारी (४ जून) दुपारपासून पाऊस सुरू होता. मंगळवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली. रात्री ११ वाजेपर्यंत शहरात २५.५ मिमी पावसाची नोंद झालीये. शहरात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली.

चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून, सरासरी ६४.८ मिमी पावसाची नोंद झालीये. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच हजेरी लावली.

आज कोकणात अतिमुसळधार, तर उर्वरित भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसह विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं. वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील माणसीश्वर मंदिराजवळ भरपूर पाणी आले होते. हे पाणी मंदिरातून वाहत होते. पाण्याचा प्रवाह एवढा होता की मंदिरातून पाणी जाताना पाहायला मिळालं. सुदैवानं कुठेही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

मुंबईतील रस्ते जलमय, ‘लोकल’चा वेगही मंदावला

सोमवारीरात्रीपासून मुंबई, मुंबई उपनगरं आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. मंगळवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालीये. यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम जाणवत आहे.

मुंबईतील पूर्वद्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल मार्ग, एलबीएस मार्ग, एस व्ही मार्ग अशा महत्वाच्या मार्गांवरील वाहतूक मंदावली असून, अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री,पाताळगंगा,उल्हास व गाढी नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 157 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक 342 मिमी, मंडणगडमध्ये 205 मिमी, संगमेश्वरमध्ये 210 मिमी, चिपळूणमध्ये 169 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 16 तासानंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट अद्याप बंदच आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहनांना चरणी मार्गे पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ सज्ज ठेवा -मुख्यमंत्री

वाढता पाऊस आणि पुराची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. सबंधित पालक सचिवांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा आणि एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    follow whatsapp