एसटीच्या संपाबाबत शरद पवार म्हणतात.. ‘आता फार ताणणं योग्य होणार नाही’

बारामती: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ज्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, आता या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यातील जवळजवळ 59 बस डेपोमध्ये संप पुकारण्यात आला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:23 AM • 05 Nov 2021

follow google news

बारामती: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ज्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, आता या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपलं मत व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

राज्यातील जवळजवळ 59 बस डेपोमध्ये संप पुकारण्यात आला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावी अशी प्रमुख मागणी संघटनांची आहे. त्याचसाठी हा संप सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, याच संपामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरु झाली आहे. अशावेळी आता शरद पवार यांनी संपाबाबत भाष्य करत लवकरात लवकर याबाबत मार्ग काढण्यात यावा असं म्हटलं आहे.

शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबीयांनी परंपरेनुसार बारामतीत गोंविदबागेत दिवाळी पाडव्याला हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतला. तसेच शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदाही पार पडला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. याच वेळी त्यांना एसटीच्या संपाबाबत देखील विचारण्यात आलं.

ह्रदयद्रावक! एसटी कर्मचाऱ्याने आगारातील बसला गळफास घेत संपवलं आयुष्य

पाहा एसटी संपाबाबत शरद पवार काय म्हणाले

‘एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत सरकारशी बोलण्याची आवश्यकता आहे. पण कामगारांच्या संघटनांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की, आम्हाला संप पुढे न्यायचा नाही. एसटी संकटात आहे हे आम्हाला ठावूक आहे. दिवाळीच्या सणात लोकांना त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे. पण काही लोंकानी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे हे घडतंय. दरम्यान, 85% एसटी रस्त्यावर आहे. 15% लोकांनी संपाची भूमिका घेतली आहे.’

‘माझं आवाहन आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना त्या संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांची सेवा चालू ठेवण्यासाठी आता फार ताणणं योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा आता हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारची निष्कर्षापर्यंतची एक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा सुद्धा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा.’ असं पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp