नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे . त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
ADVERTISEMENT
दरम्यान पंढरपुरात नदी २५ हजार क्युसेकने वाहात असल्याने पंढरपुर मधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. उजनीच्या 16 गेट मधून 40 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे . याचबरोबर वीरमधूनही 4800 क्युसेकने पाणी सोडले जात होते. आता वीरमधून पाणी सोडणे बंद झाले आहे. सोडलेल्या पाण्यामुळे भीमा दुथडी भरून वाहात आहे . उजनी धरण 109.68 टक्के भरले आहे. संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी गांवनिहाय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यामध्ये प्रत्येक गावची लोकसंख्या, शाळा – कॉलेज, मंगल कार्यालय, रुग्णालय वैद्यकीय अधिकारी, खासगी दवाखाने, आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणारे व्यक्ती, औषध दुकाने यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. धान्य वितरण व वीज वितरण विभागाकडून नदी काठचे वीज वाहक खांब तसेच रोहित्र सुरक्षित स्थळी लावण्यात आले आहे. औषधसाठा मुबलक उपलब्ध राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली .
ADVERTISEMENT
