शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र दिसत असले तरीही रस्त्यावर परिस्थिती मात्र वेगळीच दिसत आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड येथील बायपासच्या कामाचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हेंच्या आधी करत माजी खासदार आढळराव पाटलांनी सारंकाही आलबेल नसल्याचंच दाखवून दिलंय.
ADVERTISEMENT
आपल्या काही कार्यकर्त्यांच्या सोबतीने आढळराव पाटलांनी या बायपासवर नारळ फोडून याचं उद्घाटन केलं. यावेळी वाहनांना गुलाबाचं फुल देऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी या बायपासवरुन गाड्या सोडल्या. यावेळी खासदार अमोल कोल्हेंवरही आढळराव पाटलांनी तोफ डागली. “खेड घाटातलं बायपासचं काम बंद पडलेलं असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मागे लागून मी हे काम सुरु केलं. मी खासदार असताना या कामाच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला.”
त्यामुळे आताच्या खासदारांनी कामाचं श्रेय घेऊन वचनपूर्ती केल्याचं थोतांड करु नये. त्यांचा या कामाशी काहीही संबंध नाही असं म्हणत आढळराव पाटलांनी एक दिवस आधीच बायपासचं उद्घाटन केलं. काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यात शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधला वाद समोर आला होता. ज्यावरुन खासदार संजय राऊत यांना थेट अजित पवारांना तुमच्या आमदारांना आवरा असा इशारा द्यावा लागला होता. त्यामुळे भविष्यात सेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला वाद कुठवर जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT