उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराचे मंगळवारी उत्तर प्रदेशात पडसाद उमटले. या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ लखीमपूर खीरीला भेट देणार होते. मात्र, योगी सरकारने भेटीची परवानगी फेटाळून लावली आहे.
ADVERTISEMENT
लखीमपूर खीरी येथे गाडी चिरडून शेतकऱ्यांना मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले असून, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील योगी सरकारला धारेवर धरलं आहे.
लखीमपूर खीरीला भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन नजरकैद करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून प्रियंका गांधी नजरकैदेत असून, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं शिष्टमंडळ आज लखीमपूर खीरीला भेट देणार होते.
राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी काँग्रेसकडून परवानगी मागण्यात आली होती. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शिष्टमंडळाच्या दौऱ्यासाठीची परवानगी मागितली होती. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने भेटीची परवानगी नाकारली आहे. लखीमपूर खीरीत प्रशासनाने 144 कलम लावलं आहे.
लखीमपूर खीरी : ‘त्या’ आठ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारकडून विरोधकांना लखीमपूर खीरीत जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न असल्याचं दिसत आहे. लखीमपूर खीरीकडे निघालेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना
प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवलेलं असून, पंजाब आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विमान उतरण्यास परवानगी न देण्याचे आदेश लखनऊ विमानतळ प्राधिकरणाला दिले होते. त्याचबरोबर प्रियंका गांधीच्या भेटीसाठी निघालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना विमानतळावरच रोखण्यात आल्याचा प्रकारही घडला.
महत्त्वाची बाब म्हणजे घटनेचा व्हिडीओ समोर आल्यापासून उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे. देशभरातील विरोधकांकडून योगी सरकारबरोबरच मोदी सरकारलाही धारेवर धरलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली. तर ममता बॅनर्जी यांनीही घटनेवरून भाजप सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT