भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, रेपो रेट हा ४ टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट हा ३.३५ टक्के इतका राहणार आहे.
ADVERTISEMENT
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचा GDP हा – ७.३ इतका राहणार असल्याची माहिती दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. मान्सूनच्या आगमनानंतर देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यावेळी शक्तीकांत दास यांनी बोलून दाखवला. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार खुंटल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या विकासाचा दर घटवण्यात आल्याचं दास यांनी सांगितलं.
आरबीआयच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात विकासाचा अपेक्षित दर ९.५ टक्के इतका राहील. याआधी आरबीआयने हा दर १०.५० टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतू कोरोनाचं संकट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परिस्थितीशी जुळवून आर्थिक गतीचा दृष्टीकोन ठेवावा लागेल असं दास म्हणाले.
महागाईचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने पतधोरणात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं दास म्हणाले. रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट आरबीआयने जैसे थे ठेवल्यामुळे गृहकर्ज दराच्या व्याजदरातही कोणताही बदल होणार नाहीये. याचसोबत जागतिक बाजाराला चालना मिळाल्यास देशाच्या निर्यातीत सुधारणा होईल असंही दास यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT