नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघू उद्योग, सरकार पाडणं मोठा उद्योग; संजय राऊत यांचा टोला

मुंबई तक

• 11:33 AM • 26 Nov 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचं सरकार स्थापन होईल असं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या रोखठोक शैलीत नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला उत्तर दिलं आहे. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार आहे त्याला […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचं सरकार स्थापन होईल असं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या रोखठोक शैलीत नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला उत्तर दिलं आहे. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार आहे त्याला कोणताही धोका नाही हे पुन्हा एकदा सांगितलं आहे.

हे वाचलं का?

एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडत आहेत असं काही आम्हाला तरी वाटत नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग हे खातं त्यांच्याकडे आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. ते आमचे विरोधी असले तरीही मी हे सांगेन की ते मंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. कारण एक मराठी माणूस हे काम करतो आहे. मात्र महाराष्ट्राचं सरकार पाडणं हा सूक्ष्म किंवा लघू उद्योग नाही. तो मोठा उद्योग आहे. त्यामुळे नारायण राणे जे काही म्हणतात त्यात तथ्य नाही.

सहकार खातं जसं वेगळं नेमण्यात आलं इतके दिवस ते नव्हतं. तसं महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी खातं नेमावं लागेल पण ते कुणाच्या बापाला शक्य होणार नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणेंना उत्तर दिलं आहे. नारायण राणे हे उत्तम काम करत आहेत. त्यांनी ब्लू प्रिंट तयार केली आहे. देशातल्या अनेक भागात ते फिरत आहेत. मात्र सरकार पाडणं हे त्यांचं काम नाही.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते दिल्लीत आहेत असं सांगितलं जातं. प्रमुख नेते म्हणजे कोण? एकमेव आहेत देवेंद्र फडणवीस. चंद्रकात पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत आहे तिथे मस्टरवर सही करायला अधूनमधून त्यांना जावं लागत असेल त्यात काही विशेष नाही. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमधे काही घडेल असं काही नाही.

नशीब मी दिल्लीत नाही

प्रफुल पटेल, शरद पवार, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे नेते दिल्लीत आहेत म्हणून वेगवान चर्चा म्हटलं जातं आहे. मी दिल्लीत नाही गेलो हे नशीबच म्हणावं लागेल नाहीतर चर्चांचा वेग आणखी वाढला असता. वेगवान चर्चा गेल्या दोन वर्षात इतक्या वेळा झाल्या आहेत की लोक आता कंटाळले आहेत. भाजपचं हसं होतं आहे. ते अशा तारखा देतात, त्यावेळी काही घडत नाही आणि मग आम्हालाही वाईट वाटतं कारण भाजपची अवस्था वाईट झाली आहे.

पहाटेचं सरकार आजच्याच दिवशी पडलं होतं त्यामुळे त्याचा शोक व्यक्त करण्यासाठी भाजपचे लोक तारखा देत असतील. मात्र आता त्यांनी हे उद्योग थांबवले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे. ते आजारी आहेत. ते नाहीत म्हणून सरकार पडेल अशी स्वप्नं कुणाला पडत असतील तर त्यांनी उपचार करून घ्यावेत. तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्या रूग्णालयात उद्धव ठाकरे आहेत तिथे जाऊन अशा लोकांनी दाखल व्हावं आणि आपल्यावर उपचार करून घ्यावेत असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

    follow whatsapp