‘गद्दारांना माफी नाही!’, असं का म्हणाले होते आनंद दिघे?; ठाण्यात काय घडलं होतं?

मुंबई तक

09 May 2022 (अपडेटेड: 29 Mar 2023, 08:49 PM)

आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग चर्चेत आले. याच सिनेमातील एका दृश्यात आनंद दिघे ‘गद्दारांना माफी नाही’ असं म्हणताना दिसतात. पण हा संवाद आनंद दिघे नेमकं कुणासाठी म्हणाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला. आनंद दिघेंच्या या डायलॉगची सगळीकडे चर्चा झाली. […]

Mumbaitak
follow google news

आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग चर्चेत आले. याच सिनेमातील एका दृश्यात आनंद दिघे ‘गद्दारांना माफी नाही’ असं म्हणताना दिसतात. पण हा संवाद आनंद दिघे नेमकं कुणासाठी म्हणाले होते, असा प्रश्न उपस्थित झाला.

हे वाचलं का?

आनंद दिघेंच्या या डायलॉगची सगळीकडे चर्चा झाली. काय आहे या डायलॉगचा अर्थ आणि ठाण्यातल्या एका खून प्रकरणाशी याचा संबंध का जोडला जातो आहे? ते आपण जाणून घेऊयात…

1989 ला ठाण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. य़ा निवडणुकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निव़डून आले होते. काँग्रेसने देखील स्थानिक आगरी सेनेसोबत युती केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या निवडणुकीची जबाबदारी माजी महापौर सतीश प्रधान आणि आनंद दिघेंवर टाकली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवार होते. पण 30 नगरसेवक निवडून येऊनसुध्दा शिवसेनेला त्यांच्या महापौर करता आला नाही.

अवघ्या एक मताने प्रकाश परांजपे यांचा पराभव झाला. उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीतसुध्दा सेनेचा पराभव झाला. शिवसेनेला हा पराभव खूप वर्मी लागला. बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारी तेव्हा शिवसेना होती. शिवसैनिक होते.

बाळासाहेब भडकले.. पुरेसे नगरसेवक असतानाही महापौर शिवसेनेचा झाला नाही ही गोष्ट त्यांना जिव्हारी लागली आणि त्यांनी आनंद दिघेँना बोलवून घेतले आणि विचारले गद्दार कोण? तेव्हा आनंद दिघेंनी तेव्हा उद्गार काढले, ‘गद्दारांना माफी नाही’ आणि हेच उद्गार सिनेमातपण दाखवण्यात आले आहेत.

पण यानंतर पण आनंद दिघेंनी तेव्हाच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना पण हेच सांगितले की गद्दारांना माफी नाही.. त्यामुळे दिघेंचे हे विधान गाजलं होतं. दिघेंचे हेच वाक्य उचलून दुसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांनी पोस्टर लावले होते गद्दारांना माफी नाही…..

या घटनेनंतर काहीच दिवसात ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक श्रीधऱ खोपकर यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला इतका क्रूर होता ज्यात खोपकरांचा मृत्यू झाला.

श्रीधर खोपकरांच्या या खुनानंतर शिवसेनेचा फुटलेला नगरसेवक खोपकर आहे का? दिघेंच्य़ा गद्दारांना माफी नाही य़ा विधानाचा रोख खोपकरांकडे होता का? वगैरे चर्चांना उधाण आलं हे प्रकरण महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, तत्कालीन सरकारने आणि पोलिसांनी आनंद दिघेंसह 52 नगरसेवकांना अटक केली. आनंद दिघेंना टाडा कायदा लावण्यात आला. यानंतर ठाण्यात खूप तणाव निर्माण झाला होता. पुढे 2001 मध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूपर्यंत ही केस चालू राहिली. पण कोर्टात काहीच सिद्ध होऊ शकलं नाही.

आनंद दिघेंच्या वकिलांमार्फत कोर्टात बचाव करण्यात आला होता आणि दिघेंनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केलं. पण तरीही आनंद दिघेंचे गद्दारांना माफी नाही हे वाक्य आणि श्रीधर खोपकर यांची हत्या चर्चा ठाण्यात आजही होते. आणि आता धर्मवीर सिनेमाच्या निमित्ताने या चर्चांना पुन्हा उजळणी मिळाली.

‘गद्दारांना माफी नाही’ हे दिघेंचे विधान सिनेमात कोणत्या संदर्भात वापरलं असं धर्मवीर सिनेमाचे प्रोड्यूसर मंगेश देसाई यांना विचारले असता त्यांनी आनंद दिघेंच्या विरोधातले जे होते ते सगळे गद्दार असं सांगितलं तरीही गद्दार म्हणजे श्रीधर खोपकर हे समीकरण महाराष्ट्रात रुऴलं होतं. आणि त्यानंतर बराच काळ तुझा खोपकर करु असा वाक्प्रचार राजकारणात रुढ झाला होता. या प्रकरणानंतर आनंद दिघेंची ठाण्यातली दहशत अजूनही वाढली आणि ती त्याच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली.

    follow whatsapp