फडणवीसांकडून सरकारचे वाभाडे : काय आहे गिरीश महाजनांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचं प्रकरण?

मुंबई तक

• 02:22 PM • 08 Mar 2022

जामनेर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्या कार्यालयात रचण्यात आलेला कट आणि सरकारी वकीलांनी पोलिसांना या प्रकरणात कारवाईसाठी कसं मार्गदर्शन केलं याबद्दलचा गंभीर गौप्यस्फोट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केला. सरकारी वकील चव्हाण यांचा महाजनांविरुद्ध गुन्हा रचण्यात असलेल्या सहभागाचा व्हिडीओच फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे. […]

Mumbaitak
follow google news

जामनेर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्या कार्यालयात रचण्यात आलेला कट आणि सरकारी वकीलांनी पोलिसांना या प्रकरणात कारवाईसाठी कसं मार्गदर्शन केलं याबद्दलचा गंभीर गौप्यस्फोट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केला. सरकारी वकील चव्हाण यांचा महाजनांविरुद्ध गुन्हा रचण्यात असलेल्या सहभागाचा व्हिडीओच फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल सीबीआय चौकशीची मागणी केली.

गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारी वकीलांचं कुभांड – फडणवीसांचा गंभीर आरोप

२०२२ जानेवारीमध्ये पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात गिरीश महाजन आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळातील व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. त्यामुळे हा वाद नेमका आहे तरी काय की ज्यावरुन फडणवीसांनी सभागृहात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं? ते जाणून घेऊयात…

काय आहे वादाची पार्श्वभूमी?

जळगावच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून तानाजी भोईटे आणि दिवंगत नरेंद्र पाटील या गटामध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु आहे. तानाजी भोईटे यांचा गट हा गिरीश महाजनांच्या बाजूने तर नरेंद्र पाटील यांचा गट हा एकनाथ खडसेंच्या बाजूने मानला जातो. नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर Adv. विजय पाटील यांच्याकडे या गटाचं नेतृत्व आलं आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना संस्थेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने गिरीश महाजन यांनी पाटील गटावर कारवायांचा बडगा उगारला होता.

संस्थेचा भूखंड हडप करण्याचा महाजनांचा डाव – पाटील यांचा आरोप

मराठा विद्या प्रसारक संस्थेचा जळगावात मोठा भूखंड आहे. गिरीश महाजन मंत्री असताना Adv. विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यात मारहाण करण्यात आली होती. गिरीश महाजनांच्या माणसांनी पुण्यात आपलं अपहरण केल्याचाही आरोप विजय पाटील यांनी केला होता. पुण्यातून सुटका झाल्यानंतर विजय पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू गिरीश महाजन मंत्री असल्यामुळे तो गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नाही असंही विजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

कालांतराने विजय पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली, ज्यानंतर हा गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या कारवाईत गिरीश महाजनांवर मोक्का अंतर्गत कारवाई होईल असा विश्वास Adv. विजय पाटील यांनी बोलून दाखवला होता. यानंतर गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या तानाजी भोईटे यांची पुणे पोलिसांची चौकशी केली होती.

याच कारवाईची सगळी सूत्र सरकारी वकील चव्हाणांच्या कार्यालयातून हलली होती असा धक्कादायक आरोप देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात केला.

    follow whatsapp