Abhijeet Dipke parents emotional reaction : कॉक्रोच जनता पार्टी (CJP) प्रमुख अभिजीत दिपके तब्बल 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या राहत्या घरी परतले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात दिपके यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी पत्रकारांशी संवाद साधत गेल्या 40 दिवसांतील भीती, तणाव आणि मुलाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. मुलगा सुखरूप परतला, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: EMI भरत आहात? ही 'एक चूक' तुम्हाला पडू शकते 15 लाखांनी महाग!
'प्रबळ राजसत्तेला टक्कर देणे ही साधी गोष्ट नाही'
अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी सांगितले की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी केलेली वागणूक पाहून मुलगा सुखरूप घरी परतेल की नाही, अशी भीती सतत मनात होती. मात्र तो आपले काम पूर्ण करून विजयी होऊन परतत असल्याचा मोठा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. एका प्रबळ राजसत्तेला टक्कर देणे ही साधी गोष्ट नसून, त्याने केलेले काम मोठे असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अभिजीतला परदेशातून चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, तरीही त्या सोडून तो देशातील विद्यार्थ्यांसाठी लढण्यासाठी परतला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न, पुण्यातील समारंभाला दिग्गजांची उपस्थिती
'एकुलता एक मुलगा, सुरक्षिततेचीच सर्वाधिक चिंता वाटत होती'
पत्रकारांनी 'आता मुलगाच तुमचा गुरु झाला का?' असा प्रश्न विचारला असता, दिपके यांच्या वडिलांनी हसत उत्तर दिले. ते म्हणाले, "मी सिव्हिल इंजिनिअर आहे, पण त्याने शिक्षण आणि कर्तृत्वात खूप मोठा टप्पा गाठला आहे. मी माझ्या कुटुंबापुरताच विचार करत होतो, पण तो आता संपूर्ण देशाचा विचार करतो. त्यामुळे त्याचा मला अभिमान आहे." एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या सुरक्षिततेचीच सर्वाधिक चिंता वाटत होती. आंदोलनादरम्यान त्याच्याशी फार कमी वेळ संवाद होत होता आणि तो सुरक्षित असल्याची माहिती मिळेपर्यंत रात्रभर झोप लागत नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
अभिजीत दिपके यांच्या आईनेही मुलगा सुखरूप घरी परतत असल्याचा आनंद व्यक्त केला. त्याला टायफॉइड झाल्यामुळे कोणताही मोठा स्वागत समारंभ ठेवलेला नसून फुलांची सजावट आणि रांगोळी एवढीच तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये येण्याबाबत धमकी आल्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार अभिजीत परदेशात असतानाचा असून त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाला धमकी देणारी रील आली होती. मात्र आता तो विषय संपला असल्याचे त्यांनी म्हटले. पुढील किमान 15 दिवस अभिजीतने आराम करावा लागणार असल्याने तो घरीच राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मुलगा घरी परतल्याने "आमचा मुलगाच आता आमचा गुरु झाला," असे भावनिक उद्गार काढत त्यांनी गेल्या अनेक रात्री मुलाच्या फोन आणि सोशल मीडियावरील संदेशांची वाट पाहत जागून काढल्याची आठवणही सांगितली.
ADVERTISEMENT












