Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या, पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला

मुंबई तक

03 Jul 2026 (अपडेटेड: 03 Jul 2026, 10:30 AM)

akola east congress mla sajid pathan threat bishnoi gang : अकोला पूर्वचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी दिल्याचा आरोप विधानसभेत गाजला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

akola east congress mla sajid pathan threat bishnoi gang

akola east congress mla sajid pathan threat bishnoi gang

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या

point

पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला

akola east congress mla sajid pathan threat bishnoi gang  : महाराष्ट्र विधानसभेत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना धमकी देण्यात आल्याचा मुद्दा गाजला.  कुख्यात बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकर याने अमेरिकेतून फोन करून आमदार साजिद पठाण यांना धमकी दिल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सभागृहात केला. या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. धमकी मिळाल्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित आमदारांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणीही सभागृहात करण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra weather : कोकणासह राज्यभरात धो-धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना मोठा अलर्ट

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अन् नाना पटोले सभागृहात आक्रमक 

विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना ही घटना अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. बिश्नोई टोळीचा उल्लेख करत त्यांनी साजिद पठाण यांना दुसऱ्यांदा धमकी आल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुभम लोणकरने अमेरिकेतून फोन करून धमकी दिली असून त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे. संबंधित फोनमध्ये पैसे न दिल्यास संबंधित व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडली होती, मात्र त्यानंतरही अशी घटना घडल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं. नाना पटोले यांनीही हा मुद्दा उपस्थित करत, अधिवेशन सुरू असताना एखाद्या आमदारालाच धमकी मिळत असेल तर हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण सभागृहाच्या सुरक्षेचा विषय असल्याचं सांगितलं.

हेही वाचा : दोन लग्न केलेल्या प्रेयसीची हत्या, चौथ्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा प्रियकराचा दावा

नितेश राणे आणि शंभुराज देसाई यांच्याकडून कारवाई करण्याचे आश्वासन 

विरोधकांच्या आरोपांनंतर मंत्री नितेश राणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की, बिश्नोई टोळीसंदर्भात सरकारची अधिकृत भूमिका यापूर्वी मुख्यमंत्री यांनी सभागृहात स्पष्ट केली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही, अशी भूमिका सरकारची असल्याचं त्यांनी नमूद केलं. साजिद पठाण यांच्याकडे धमकीसंदर्भातील ऑडिओ क्लिप किंवा इतर कोणतेही पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावेत, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारवर टीका सुरूच ठेवली.

यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनीही सभागृहात भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, एखाद्या आमदाराला धमकी मिळाल्याची बाब निश्चितच गंभीर असून, सभागृहातील प्रत्येक सदस्याच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या क्रमांकावरून फोन आला असेल किंवा संबंधित घटनेबाबतची सविस्तर माहिती सरकार किंवा अध्यक्षांकडे दिल्यास त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. विरोधकांनी या प्रकरणावर तातडीने कारवाईची मागणी केली, तर सरकारने पुरावे उपलब्ध करून देण्याचं आवाहन करत कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.