'CM फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी राग, द्वेष असेल तर...', उपोषण सुरू होताच जरांगे काय म्हणाले?

Manoj Jarange: आता आम्हाला कळेल मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, आकस, राग आहे की नाही.. असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. त्यांनी आजपासून (25 जानेवारी) पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.

Mumbai Tak

रोहित गोळे

25 Jan 2025 (अपडेटेड: 25 Jan 2025, 02:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलं उपोषण

point

मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंची कंबर कसली

point

पाहा देवेंद्र फडणवीसांबाबत नेमकं काय म्हणाले

अंतरवाली सराटी: मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून (25 जानेवारी) पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चुचकारलं आहे. 

हे वाचलं का?

'मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनात जर आकस, द्वेष, राग असेल, त्यांना मराठ्यांचे पोरं मारून टाकावे वाटत असतील तर नाही देणार आरक्षण ते.' असं म्हणत जरांगेंनी एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांनाच पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

जरांगेंनी उपोषण सुरू करताच CM फडणवीसांना घेरलं, पाहा नेमकं काय म्हणाले..

'आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे अधिसूचना काढली होती याला. एक वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल असं या समाजासोबत घडतंय. एक वर्ष झालं समाज रस्त्यावर झुंजतोय. स्वत:च्या लेकारचं स्वप्न घेऊन वर्षभर करोडोंच्या संख्येने झुंजतोय.'

हे ही वाचा>> Manoj Jarange : 'मुख्यमंत्री साहेब..यांचा माज उतरवायला आम्हाला...', वाल्मिक कराड समर्थकांना मनोज जरांगेंचा इशारा

'आज आम्ही पुन्हा एकदा.. ज्या जुन्या मागण्या आहेत त्याच नव्याने मागण्या सरकारकडे करत आहोत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रच द्या. असा कायदा, जीआर किंवा अध्यादेश काढून या राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं तात्काळ वाटप करण्यात यावं.' 

'आमची दुसरी मागणी सगेसोयरेची अंमलबजावणी ही तातडीने करायची. आता एक वर्ष होत आहे, त्यामुळे आता आमच्याकडे संयम नाही. सगेसोयरे म्हणजे.. ज्या मराठ्यांची कुणबी नोंदणी आली त्या नोंदीच्या आधारावर त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं.' 

'कारण ज्यांची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सग्यासोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून.. अशा मागण्या आम्ही सरकारकडे दिल्या आहेत. या पूर्वीच्याच मागण्या आहेत.'

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"

'इथे जरी उपोषण असलं तरी संतोष भैय्यासाठी देखीलसाठी आणि मराठा समाजासाठी पण आहे. त्यामुळे ही लढाई सुरू आहे, सुरू राहील.' 

'पूर्वी ढकलाढकली व्हायची.. फडणवीस साहेब म्हणायचे तुम्ही शिंदे साहेबांना विचारा.. आता तुम्हीच आहेत. काय टेन्शन आहे का आता? ढकलाढकली काही आहे का? सरकार तुमचं, मुख्यमंत्रीही तुम्हीच.. बहुमतही तुमचं आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळेल मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, आकस, राग आहे की नाही.. तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यावे वाटतात की नाही. प्रत्यक्ष बघणार आहेत आम्ही या उपोषणामध्ये.' 

'तुमची मराठ्यांबद्दलची भावना काय? हे सगळे बघणार आहेत. म्हणजे तुमच्या पक्षातील मराठे पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठे पण बघणार आहेत. आता बोलायला जागाच नाही.' 

'मुख्यमंत्री उघडे पडू द्या आता.. त्यांच्या मनात जर मराठ्यांविषयी राग नाही तर आरक्षण देऊन टाकतील. मराठ्यांच्या पोरांना फाशी घेऊ द्यायची नसेल, मरू द्यायचं नसेल तर देतील आरक्षण.'

'त्यांच्या मनात जर आकस, द्वेष, राग असेल त्यांना मराठ्यांचे पोरं मारून टाकावे वाटत असतील तर नाही देणार आरक्षण ते. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचाय. हे लोकांपुढे उघडं पडेल.'

'पण आम्हाला खात्री आहे.. मला नाही वाटत की, ते मराठ्यांशी बेईमानी करतील. कारण मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही.' असं जरांगे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp