नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67(A) अंतर्गत राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, जगदीप धनखड यांनी लिहिले आहे की, 'आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.' पावसाळी अधिवेशनाला अवघा एक दिवस शिल्लक असताना उपराष्ट्रपतींनी ज्या पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला आहे ते पाहता राजधानी दिल्लीत सारं काही आलबेल नसल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, राजीनामा देताना धनखड यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले. तसेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानले.
हे ही वाचा>> 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?
जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की, 'संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला स्नेह, विश्वास आणि आदर माझ्या हृदयात आयुष्यभर राहील.' उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देताना ते म्हणाले, 'या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अनुभवांबद्दल आणि दृष्टिकोनांबद्दल मी मनापासून आभारी आहे. भारताच्या आर्थिक विकासाचे आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या टप्प्याचे साक्षीदार होणे माझ्यासाठी भाग्याची आणि समाधानाची गोष्ट आहे.' भारताच्या जागतिक उदय आणि उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास व्यक्त करून त्यांनी राजीनामा दिला.
धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत
जगदीप धनखड यांच्यापूर्वी, आणखी दोन उपराष्ट्रपती होते जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कृष्णकांत यांनी 21 ऑगस्ट 1997 रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. परंतु 27 जुलै 2002 रोजी त्यांच्या कार्यकाळात त्यांचे निधन झाले. यामुळे ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. याशिवाय, वराहगिरी वेंकट गिरी (व्ही.व्ही. गिरी) यांनीही 1969 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात राजीनामा दिला होता, जेणेकरून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतील.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राष्ट्रपतींना उद्देशून राजीनामा
2022 मध्ये जगदीप धनखड यांनी भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. जगदीप धनखड यांना एकूण 725 पैकी 528 मते मिळालेली, तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळालेली. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
हे ही वाचा>> '25 वयापर्यंत पोरींनी तोंड काळं केलेलं असतं..', अनिरुद्धाचार्यांचं खळबळजनक विधान, नेत्यांनी धरलं धारेवर!
जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केले. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते चित्तोडगड सैनिक शाळेत शिकण्यासाठी गेले. धनखड यांची राष्ट्रीय संरक्षण अकादमीत निवड देखील झालेली, परंतु ते गेले नाहीत.
चौधरी देवीलाल यांनी जगदीप धनखड यांना राजकारणात प्रवेश दिला
त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. राजस्थान विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये राहून कायद्याचा सराव सुरू केला आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील म्हणून नावलौकिक मिळवला. धनखड 1979 मध्ये राजस्थान बार कौन्सिलमध्ये सामील झाले. 27 मार्च 1990 रोजी ते राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील झाले. त्याच वेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. 1987 मध्ये ते राजस्थान उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
जगदीप धनखड चौधरी देवीलाल यांच्या राजकारणाने प्रभावित झाले होते. देवीलाल यांनीच त्यांना राजकारणात आणले. 1989 मध्ये देवीलाल यांचा 75 वा वाढदिवस होता. जगदीप धनखड राजस्थानहून 75 वाहनांच्या ताफ्यासह दिल्लीला पोहोचले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस लोकसभा निवडणुका झाल्या.
राजीव गांधींच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्हीपी सिंह यांनी त्यांच्या विरोधात निषेधाचा नारा दिला होता. व्हीपी सिंह यांच्या जनता दलाने जगदीप धनखड यांना त्यांच्या गावी झुंझुनू येथून तिकीट दिले. व्हीपी सिंह यांचे सरकार स्थापन झाले. देवीलाल उपपंतप्रधान झाले आणि जगदीप धनखड यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले होते.
ADVERTISEMENT
