delhi jantar mantar neet protest : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, 20 जुलै 2026 रोजी सुरुवात होत असतानाच कॉकक्रोच जनता पार्टी (CJP) ने 'चलो संसद' मार्चची हाक दिली. आंदोलनस्थळ आणि जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील प्रचंड गर्दी ड्रोनद्वारे टिपण्यात आली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सकाळी 9 वाजताचा आहे. या आंदोलनादरम्यान संसदेकडे कूच करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरूच असल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, समृद्धी महामार्गावर 6 जणांचा होरपळून मृत्यू
मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवली, आंदोलकांवर लाठीचार्ज
आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यानंतर जंतर-मंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच दिल्ली परिसरात मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून आंदोलनाचा विस्तार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडींमुळे जंतर-मंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा : '..तर मी उपोषण सोडेन', सोनम वांगचुक यांनी मोदी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी; काय म्हणाले?
सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका
दरम्यान, या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचे वृत्त अतिशय संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडणाऱ्या आंदोलनकर्त्यांची दखल सरकार घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. उलट लाठीहल्ला करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच दिल्लीतील संबंधित मार्गांवरील मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दीर्घकाळ चाललेल्या अशा आंदोलनाची कोणतेही संवेदनशील आणि लोकशाही मार्गावर विश्वास ठेवणारे सरकार दखल घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र विद्यमान सरकार आंदोलनाचा आवाज आणि त्यातील आक्रोश ऐकण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा आम्ही सर्वजण त्रिवार निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
ADVERTISEMENT












