भाजपच्या बुस्टर डोस सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. बाबरी मशीद, मशिदींवरील भोंगे आणि नवनीत राणा, रवी राणा दाम्पत्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.
ADVERTISEMENT
मुंबईतील सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा झाली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आजचा दिवस हा अनेक हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस आहे. पण काही लोकांना असं वाटतं की ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राची १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे.”
“लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी असं म्हणणार नाही. कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही,” असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर फडणवीस म्हणाले, “काय आश्चर्य आहे बघा. आता महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटली की राजद्रोह होतोय. ते राणा पती-पत्नी. काय सांगितलं त्यांनी, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणतो.”
“त्यांनी मला आधीच सांगितलं असतं, तर मी म्हटलं असतं जाऊद्या मुख्यमंत्री… मी माजी मुख्यमंत्री आहे, माझ्या घरासमोर येऊन म्हणा. पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही हनुमान चालीसा म्हणतो म्हटल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागला. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे? हनुमान चालिसाने केवळ रावणाचे सरकार उलथवले जाते, रामाचे नाही. आता सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या?,” असा सवाल फडणवीसांनी शिवसेनेला केला.
“भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. मी त्याला मशिद मानत नाही. तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता?”
“बाबरी पाडल्याबद्दल ज्या ३२ नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले, त्यात तुमचा एक नेता दाखवा. ३२ नावांच्या आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती. मी स्वतः तुरुंगात होतो,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT