राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Raj Thackeray : "लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते.

 Devendra Fadnavis on Raj Thackeray

Devendra Fadnavis on Raj Thackeray

मुंबई तक

14 Dec 2025 (अपडेटेड: 14 Dec 2025, 08:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं;

point

आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी (दि.14) महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एनसीआरबीच्या आकडेवारी सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत काय म्हटलं होतं? आणि देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देताना काय म्हणाले? हे सविस्तर जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

हेही वाचा : धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!

यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?

आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !

असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.

राज ठाकरेंच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आकडेवारी मोठी असली तरी परिस्थिती वेगळी आहे. एखादी मुलगी घरात भांडून निघून गेली आणि पुन्हा तीन-चार दिवसांनी परत आली, तरी तिची बेपत्ता होण्याची तक्रार दाखलच असते. वर्षभरात 20 टक्क्यांपर्यंत मुली परत आणतो किंवा त्याच घरी परत येतात. पुढील वर्षात आणखी काही मुली सापडतात किंवा घरी येतात. त्यामुळे हो आकडेवारी मोठी दिसत असली, तरी परिस्थिती तशी नाही. यापूर्वीही बेपत्ता मुलींच्या संदर्भातील कारणे आकडेवारीसह दिली आहेत. राज यांच्या काही शंका असल्याम त्यांना नक्की उत्तर देईन.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!

    follow whatsapp