Ajit Pawar: ‘राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्र आली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार’

मुंबई तक

18 Apr 2023 (अपडेटेड: 18 Apr 2023, 01:57 PM)

ShivSena: ‘राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्र आली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार’ असं मोठं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. जाणून घ्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या घडामोडी.

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) हे लवकरच आपल्या काही आमदारांसोबत भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याच चर्चेमुळे शिंदेंच्या शिवसेनेतही (Shiv Sena) खळबळ माजली आहे. कारण जर अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपसोबत आले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, तो एकनाथ शिंदेंना थेट शह असेल.. या सगळ्या राजकीय घडामोडी अत्यंत झपाट्याने सुरु असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. (if ncp unites with bjp shiv sena will come out of power spokesperson sanjay shirsats big statement ajit pawar eknath shinde)

हे वाचलं का?

‘जर अजित पवार हे स्वतंत्रपणे भाजप किंवा शिवसेनेत आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण जर राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपसोबत जाणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही.’ असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे.

पाहा संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले:

‘अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. अनेक पक्षात असं होतं… आमच्याबाबत देखील आमचा तोच अनुभव आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडलं? आम्ही आघाडी का सोडली? कारण आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही. तिकडचा असणारा नेता तो ज्या काही पद्धतीने कारभार करतो. आज अजितदादांना मोकळीक नाही असं माझं मत आहे. त्यामुळे जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. नाहीतर आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही. राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार भाजपमध्ये गेले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे.’

हे ही वाचा>> महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?

‘आता जर अजित पवार स्वतंत्र झाले तर त्यांची भूमिका बदलेल. जर त्यांना भाजप-शिवसेनेच्या विचारधारेशी जोडायचं असेल. विचार मान्य असेल तर त्यांचं स्वागत आहे.’

‘अजित पवार नव्हे तर काँग्रेसमध्ये देखील हीच अवस्था सुरु आहे. त्यातील अनेक आमदारांना वाटतं की आघाडीमध्ये राहू नये. 15 आमदार असलेला पक्ष 40-45 जणांचं नेतृत्व करायला लागला. तर त्यांना मान्य नाही.. म्हणून ते सुद्धा याच मार्गावर आहेत.’

‘आम्ही उठाव केला तेव्हा आमची भूमिका स्पष्ट होती की, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही. म्हणून आम्ही वेगळे झालो. वेगळं होताना आम्ही आमचं अस्तित्व ठेवलं. जर उद्या अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होत असतील त्यांचं स्वत:चं अस्तित्व ठेवत असतील त्यांचं स्वागत करायला हरकत नाही.’

हे ही वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?

‘आमची शिवसेना-भाजपची विचारधारा त्यांना मान्य असेल तर आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत राहू. राष्ट्रवादी हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्याचे हे सर्व सदस्य आहेत. म्हणून आता त्या पक्षातील अस्वस्थता आता बाहेर पडू लागली आहे. त्याचा परिणाम १-२ दिवसात दिसून येईल. राजकारणात निर्णय घ्यायला धाडस लागतं. त्यासाठी वेळेची वाट पाहावी लागत नाही.’

असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. यामुळे आता अजित पवार हे नेमका काय निर्णय घेणार आणि याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp