Arvind Kejriwal : CM केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरेंना 'मेसेज'

मुंबई तक

22 Mar 2024 (अपडेटेड: 22 Mar 2024, 12:50 PM)

Arvind Kejriwal Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर भाजप नेत्यांने उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केलं आहे.

follow google news

Arvind Kejriwal Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यांच्या अटकेचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले आहेत. पण, केजरीवालांच्या अटकेतून उद्धव ठाकरेंना काय मेसेज, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्यानेही पोस्ट केल्याने या चर्चेला हवा मिळाली आहे. 

हे वाचलं का?

अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. दोन तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

भाजप आमदाराचं ट्विट, ठाकरेंकडे बोट

अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक पोस्ट केली. "भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतो, तर टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो."

हेही वाचा >> "माढ्यातील एक खासदार पडला, तर...", रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अतुल भातखळकर यांनी ही पोस्ट केली.

आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतलेले नसले, तरी त्यांचा रोख ठाकरेंकडेच आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकारवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुलीच्या प्रकरणात अटक झाली होती.

किरीट सोमय्या यांचं ट्विट 

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना घेरले आहे. ठाकरे सरकारनेही जानेवारी २०२२ मध्ये वाईन घोटाळा केला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अबकारी मद्य धोरण बदलले होते. आम्ही महाराष्ट्रातील मद्य घोटाळा उघडा केला होता", असे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही अशाच प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांनीही शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. असं असलं तरी ठाकरेंच्या बाजूने असलेल्या अनेक नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे.

हेही वाचा >> कोणत्या पक्षाला किती इलेक्टोरल बॉड मिळाले? SBI ची संपूर्ण लिस्ट 

अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी, संजय राऊत, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक नेत्यांवर आरोप आहेत. या नेत्यांच्या चौकशा ईडी, आयकरकडून सुरू आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप भाजपकडून सतत केले जात आहेत.

विशेषतः कोविड काळात टक्केवारीने पैसे घेतल्याचे, तसेच कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोपही आहेत. कट, करप्शन आणि कमिशनचा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी राज्यात राबवला, असा आरोप एकनाथ शिंदेंही केला आहे.

 नेते रडारवर... ठाकरेंवर दबाव?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीसमोर महाविकास आघाडीचे आव्हान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर भाजपकडून मविआला धक्के देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांचे अनेक नेते ईडी, आयकरच्या रडारवर आहेत. या नेत्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    follow whatsapp