MLA Sanjay Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महायुतीमध्ये भाजपाने ही जागा आपल्या वाट्याला घेऊन सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असतानाच, शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजप सत्तेत असूनही शिवसेनेला हळूहळू संपवण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला असून, हे एक 'स्लो पॉयझन' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : समजून घ्याः C Voter चा सर्व्हे.. NEET सह परीक्षांमध्ये गोंधळ, तरूणांमध्ये प्रचंड संताप?
संजय गायकवाडही भाजपवर भडकले
"भाजपा शिवसेनेला संपवेल ही अब्दुल सत्तारांची व्यथा खरी आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्तेत येता आलं आणि दुसऱ्यांदा सत्ता भोगता आली. दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण करून देखील कारवाई झाली नाही. सुनेत्राताई यांना राष्ट्रवादीच अर्थ खात देखील अजून देत नाहीत. भाजपाचे काही ज्येष्ठ नेते माझ्या मतदारसंघातील लक्षवेधी देखील लावू देत नाहीत", असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
अब्दुल सत्तारांनंतर गायकवाडांचीही खदखद
अब्दुल सत्तार यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही भाजपवर आपली तीव्र नाराजी आणि खदखद व्यक्त केली आहे. भाजपला सत्तेत स्थान मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असताना, आता मित्रपक्षावरच अन्याय होत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. आपल्या मतदारसंघातील लक्षवेधी प्रश्नांवर भाजपचे ज्येष्ठ नेते अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण होऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मित्रपक्षांना योग्य वागणूक मिळत नाही - गायकवाड
संजय गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची व्यथा अगदी रास्त असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे. एवढेच नव्हे तर, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनाही अर्थ खाते मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. मित्रपक्षांना योग्य वागणूक मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात झालेला हा संघर्ष महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पालकमंत्री असतानाही शिवसेना संपवण्याचे काम होत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. भाजपच्या या धोरणामुळे शिवसेनेचे गड एक-एक करून संपत आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण या सर्व तक्रारी मांडणार असल्याचे सत्तारांनी जाहीर केले असून, यावरून आगामी काळात महायुतीतील अंतर्गत कलह अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ADVERTISEMENT











