नवी दिल्ली: आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेलेया रोमांचक विजयावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करताना एक खास आणि अचूक शब्दात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या क्रिकेट संघाच्या कामगिरीची प्रशंसा करताना 'Operation Sindoor' या शब्दांचा उल्लेख केला. जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्विट पंतप्रधान मोदींनी 29 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12:20 पोस्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
PM मोदींनी नेमकं काय केलं ट्विट?
ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, "#OperationSindoor on the games field. Outcome is the same - India wins! Congrats to our cricketers."
''खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर.
निकाल एकच आहे - भारत जिंकला!
आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन."
असं ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आशिया चषकात तब्बल तीन वेळा पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद भारतीय संघाने पटकावलं. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाच्या विजयानंतर ट्वीट करून पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला आहे.
आशिया चषक फायनलचा संदर्भ
आशिया चषक 2025 चा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.1 षटकांत सर्वबाद 146 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानच्या 147 धावांचं आव्हान भारतीय संघाने केवळ 5 गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केलं. ज्यामध्ये तिलक वर्मा (69 धावा, नाबाद) आणि शिवम दुबे यांच्या शानदार खेळीमुळे भारताने हा सामना जिंकला आणि एशिया कपचे विजेतेपद पटकावले. तिलक वर्माला या सामनाचा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.
'ऑपरेशन सिंदूर' आणि PM मोदींचं ट्वीट
पंतप्रधान मोदींच्या ट्विटमधील 'ऑपरेशन सिंदूर' या संज्ञेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की हे अप्रत्यक्षपणे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून केलेल्या सैनिकी कारवाईकडे संकेत करत असावे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांवर मिसाइल हल्ले करण्यात आले होते. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता, आणि आता त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट मैदानावर भारताचा विजय हे पंतप्रधानांनी 'ऑपरेशन सिंदूर'शी जोडले असावे, असे काहींचे मत आहे. यावरून सोशल मीडियावर राजकीय आणि खेळाशी संबंधित चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
पंतप्रधानांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी तिलक वर्माच्या खेळीचे कौतुक केले, तर काहींनी 'ऑपरेशन सिंदूर' या संज्ञेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटाने क्रिकेट आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम दाखवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे शब्द खेळापलीकडे जाऊन भारताच्या संरक्षण आणि विजयाच्या भावनेशी जोडले गेले आहेत, ज्याने आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
