Prashant Jagtap first reaction about Uddhav Thackeray and Eknath Shinde offer : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यानंतर आणि दोन्ही गटांमध्ये प्राथमिक पातळीवर बैठका सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी मोठ्या घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक तसेच सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, प्रशांत जगतापांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, त्यापूर्वी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेच्या दोन्ही गटांकडूनही जगताप यांना संपर्क करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना (ठाकरे गट) मध्ये येण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी देखील जगताप यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंचा फोन, पण संवाद टाळला
एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच प्रशांत जगताप यांना फोन केल्याची चर्चा आहे. मात्र, या फोनवर बोलणे जगताप यांनी टाळल्याचे समजते. शिंदे गटाकडून शिवसेनेत प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन्हीही प्रशांत जगताप यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही, जगताप यांची वैचारिक भूमिका पाहता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अधिक शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : अकोला हादरलं, पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही अब्रू लुटली, नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांनी माझ्याशी संवाद साधल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याशी त्यांनी वेळ काढून बोलणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. भाजपला ठामपणे विरोध करण्याची भूमिका असलेल्या राज्यातील आक्रमक नेत्याने माझ्या भावना समजून घेतल्या आणि ‘तुम्ही आमच्या पक्षात काम करू शकता,’ असे मला सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मी भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नाही, हे स्पष्ट आहे. आज माझ्या राजकीय आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. उद्धव साहेबांचा मी कायम ऋणी राहीन. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची क्षमता ओळखली. पुढील दोन-तीन तासांत माझा अंतिम निर्णय जाहीर होईल.
संविधान आणि पुरोगामी विचारांची लढाई
माझी राजकीय लढाई ही कोणत्याही एका नेत्याविरोधात नसून, संविधानाच्या रक्षणासाठी आणि पुरोगामी विचारसरणीसाठी आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारला आणि महायुतीला प्रभावीपणे आव्हान देऊ शकणाऱ्या शक्तीचीच मी निवड करणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











