राहुल गांधींच्या शेजारी उभी राहून महाराष्ट्राच्या रिया अहीरची दिल्लीतून डरकाळी!

मुंबई तक

• 08:33 PM • 05 Aug 2026

Riya Ahir on Student Protest: विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांचे कौतुक केलं. तर यावेळी महाराष्ट्रातील आंदोलनकर्ती रिया अहीरने स्वतःवर होत असलेल्या कथित छळ, धमक्या आणि एफआयआरबाबत गंभीर आरोप केले.

rahul gandhi on student protest students did nothing wrong riya ahir speaks out on harassment threats and fir

रिया अहीर आणि राहुल गांधी

Google CTA

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक केले. विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थी आंदोलनकर्त्यांशी मोकळेपणाने चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी, या तरुणांनी संविधान, शिक्षण व्यवस्था आणि भारताच्या भविष्यासाठी संघर्ष केल्याचे म्हटले.

हे वाचलं का?

पाहा आधी राहुल गांधी काय म्हणाले

राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांनी कोणावरही हिंसा केली नसल्याचा दावा केला. उलट त्यांचा सातत्याने छळ करण्यात आला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, लाठीमार करण्यात आला आणि मारहाण करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी चर्चेदरम्यान सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी मांडलेल्या एका मुद्द्याचा विशेष उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, अन्याय कोणावरही झाला तरी नागरिक म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हीच संविधानिक आणि राष्ट्रवादी मूल्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा>> अभिजीत दीपकेंचा लाखो डॉलरचा शिक्षण खर्च चौकशीत सापडणार?

यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांचे उघडपणे कौतुक करत, "तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा किंवा ती स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे स्पष्टपणे म्हटले.

इंग्रजीतील आपल्या वक्तव्यात त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरही टीका केली. सध्याची शिक्षण व्यवस्था त्रुटीपूर्ण, कोलमडणारी आणि निरुपयोगी असल्याचा दावा करत, अशा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा नसून ती बदलण्याची आणि दुरुस्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा पेपरफुटी थांबवण्याची मागणी आंदोलनकर्ते करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच, आंदोलनकर्त्यांच्या घरी गुंडे पाठवणे, महिलांना आणि अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने माफी मागायला लावणे आणि त्यानंतर ती माफी स्वीकारणे योग्य नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.

महाराष्ट्रातील रिया अहीरचे रोखठोक सवाल

यानंतर महाराष्ट्रातील आंदोलनकर्ती रिया अहीर हिने आपली भूमिका मांडली. तीच मुंबई पोलिसांसमोर उभी राहिलेली आणि सोशल मीडियावर चर्चेत आलेली मुलगी असल्याचे सांगत, तिने माध्यमांना तिच्याबाबतचे कथित चित्र बदलण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा>> अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...

रिया अहीरने दावा केला की, तिने 20 विद्यार्थ्यांना बेकायदेशीर ताब्यात घेण्यापासून रोखले होते. मात्र त्यानंतर स्वतःचा सातत्याने छळ होत असल्याचे तिने सांगितले. सोशल मीडियावर तिच्याबाबत अश्लाघ्य आणि अपमानास्पद पोस्ट केल्या जात असल्याचा आरोपही तिने केला.

तिने 27 तारखेला गुन्हा नोंदवला असल्याचे सांगत, 5 तारखेपर्यंत एफआयआरची प्रत मिळालेली नसल्याचा दावाही केला.

शेवटी, रिया अहीरने माध्यमे आणि नागरिकांना आवाहन करत, अन्यायाविरोधात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण उभे राहिलो, तेच विद्यार्थी आज आपल्या पाठीशी उभे असल्याचेही तिने नमूद केले.