सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्याच निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षित विजय मिळवत सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रभावाखालील मानल्या जाणाऱ्या या प्रभागात अपक्षांनी बाजी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चेतन सोळंकी आणि रेणू येळगावकर यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग ‘दोन्ही राजेंचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा विजय म्हणजे स्थानिक राजकारणातील असंतोष स्पष्टपणे समोर आल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीकडे सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पहिल्याच फेरीतील निकाल जाहीर होताच राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या चिन्हापेक्षा व्यक्ती, काम आणि थेट संपर्काला मतदारांनी प्राधान्य दिल्याचे या निकालातून दिसून येते. अपक्षांची एन्ट्री आणि तीही प्रभावशाली नेतृत्वाच्या बालेकिल्ल्यात झाल्याने उर्वरित प्रभागांतील लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या चालू असलेल्या मतमोजणीमध्ये नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार तेजस सोनवले 2500 मताने आघाडीवर आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











