uddhav thackeray interview : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जंतरमंतरवरील आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरण आणि राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार या मुद्द्यांवर मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीतील जंतरमंतरवर उसळलेले आंदोलन हे केवळ नीट पेपरफुटीविरोधातील नसून गेल्या अनेक वर्षांपासून देशातील जनतेची झालेली फसवणूक, बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढत्या असंतोषाचा उद्रेक झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये देश वाचवण्याची भावना असून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. सरकारला व्यवस्था चालवता येत नसल्याचा आरोप करत देशभरात जनतेचा संताप वाढत असल्याचेही ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Inside Story: CM फडणवीसांना तडकाफडकी बोलावलं दिल्लीला, पण या मीटिंगची आतली कहाणी भलतीच!
'राम मंदिराची पेटी दानपेटी लुटली जाते'
उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी यांच्या नकार घंटाच मिळतायत. रोजगार मिळत नाहीये. महागाई कमी होत नाही. पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव कमी झाले का? पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यात सुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती खड्डे पडतायत आहे. पूल पडतायत, पक्ष फोडले जाता आहेत. दानपेट्या म्हणजे राम मंदिराची पेटी दानपेटी फोडली जाते फोडली म्हणजे लुटली जाते. पेपर फुटतायत या सरकारला कशाशीच काही पडलेल नाहीये.
दिल्ली दौऱ्यात जंतरमंतरवर आंदोलक आणि जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आपण व्यथित झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिक्षण, रोजगार, महागाई आणि पेपरफुटी यांसारख्या प्रश्नांमुळे तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्या मागण्यांकडे सरकारने माणुसकीच्या नजरेने पाहिले पाहिजे होते, असे ते म्हणाले. या आंदोलनाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्ग काढावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.
रामरक्षा आंदोलन सुरूच राहणार
राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे म्हटले. मंदिराच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच मंदिराशी संबंधित गैरप्रकार घडू दिल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा संपूर्ण आणि पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. रामरक्षा आंदोलन सुरूच राहणार असून मंदिराशी संबंधित प्रत्येक प्रकरणात सत्य समोर यावे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी तरुणांच्या आंदोलनाला राजकारणापलीकडे जाऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. शिवसेना ही सुरुवातीपासून तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना असल्याचे सांगत भविष्यातही तरुणांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील लोकशाहीला या आंदोलनामुळे नवसंजीवनी मिळाल्याचा दावा करत सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संवादाचा मार्ग स्वीकारावा, असेही ते म्हणाले. शेवटी त्यांनी देशभरातील नागरिकांना पक्ष आणि धर्माच्या पलीकडे जाऊन तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
ADVERTISEMENT












