Gautam Gambhir Hai Hai Fans Chant In Front Of India Coach : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. गुवाहाटीतील सामन्यानंतर घडलेली एक घटना सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सामना संपताच गंभीर मैदानात उतरले, तेव्हा स्टँडमध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांनी मोठ्याने “गौतम गंभीर हाय हाय” अशा घोषणा दिल्या. स्वतःच्या देशात, आपल्या लोकांकडून अशा प्रकारचा विरोध होईल, याची गंभीरलाही कल्पना नसावी.
ADVERTISEMENT
गौतम गंभीर यांच्याविरोधात चाहत्यांची घोषणाबाजी कशामुळे?
गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात भारताने आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये मात्र टीम इंडियाची स्थिती चिंताजनक झाली आहे. गंभीर यांच्या कोचिंगमध्ये भारताने घरच्या मैदानावर सलग दोन वेळा क्लीन स्वीपचा अपमान सहन केला. न्यूझीलंडने 3-0, तर अलीकडील मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने भारताला हरवले. याच काळात टीम इंडिया फक्त बांगलादेश, वेस्ट इंडीजसारख्या तुलनेने कमजोर संघांवरच विजय मिळवू शकली. ऑस्ट्रेलियातील मालिका गमावली, तर इंग्लंडविरुद्धची मालिका ड्रॉ झाली. त्यामुळे कसोटीतील अपयशाची सर्वाधिक जबाबदारी गंभीरवर टाकली जात आहे.
प्रेक्षकांची घोषणाबाजी आणि सिराजची प्रतिक्रिया चर्चेत
गुवाहाटीमध्ये पराभवानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. मैदानाभोवती प्रेक्षकांचा असंतोष स्पष्टपणे दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रेक्षक गंभीरविरुद्ध घोषणा देत होते. त्या वेळी मैदानात भारतीय खेळाडू आणि सहाय्यक स्टाफ उपस्थित होता. अगदी त्या क्षणी मोहम्मद सिराजने अप्रतिम परिपक्वता दाखवली. त्याने हातावर बोट ठेवून प्रेक्षकांना शांत राहण्याचा इशारा दिला, जणू तो म्हणत होता—संघ कठीण परिस्थितीत आहे, असा वागणे योग्य नाही. या छोट्याशा कृतीने सिराजने आपल्या प्रशिक्षकाला साथ दिली आणि संघाबद्दल आदर दाखवला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांकडून सिराजवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताची चिंताजनक आकडेवारी
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकत्वाखाली भारताने आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताने 7 विजय मिळवले आहेत, तर 10 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. हा आकडा स्वतःच सांगतो की, कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडिया संकटात आहे. घरच्या मैदानावर दोन वेळा क्लीन स्वीप होणे भारतीय चाहत्यांना अजिबात रुचलेले नाही. परिणामी, गंभीरच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पुढील आव्हाने कोणती?
2026 मध्ये श्रीलंकेविरुद्धची मालिका टीम इंडिया आणि गंभीर दोघांसाठीही परीक्षेची ठरणार आहे. त्याआधी संघ व्यवस्थापनाने तीन मुख्य समस्यांवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे—
1. ढासळणारी फलंदाजी
2. धार गमावलेली गोलंदाजी
3. संतुलित टीम कॉम्बिनेशनचा अभाव
भारत अजूनही अनेक फॉरमॅटमध्ये अव्वल दर्जाच्या संघांपैकी एक आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये चमकायचे असेल, तर व्यापक बदल आणि स्पष्ट धोरणाची गरज असल्याचे तज्ज्ञही मान्य करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भारतीय महिलेने पासपोर्ट दाखवला, चीनचे अधिकारी म्हणाले, अरुणाचल प्रदेश आमचा आहे; 18 तास अडवणूक अन्...
ADVERTISEMENT











