मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आयपीएलवरही झाला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून हा निर्णय जाहीर केला. खेळाडू, चाहते आणि सर्व संबंधितांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्णय
भारताने 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला, मात्र संरक्षण यंत्रणेनं यशस्वीपणे उत्तर दिलं. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. जम्मू, पठाणकोट, आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर हल्ल्यांचा प्रयत्न, तसेच जम्मूमधील ब्लॅकआऊट आणि हवाई हल्ल्याच्या सायरनमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
हे ही वाचा >> भारतासमोर तोंडावर आपटलेल्या पाकिस्तानने आता कर्जासाठी हात पसरले, समोर आले स्पष्ट पुरावे
या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. सरकारशी सल्लामसलत करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. खेळाडू, चाहते आणि सर्व संबंधितांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे."
आयपीएलवर परिणाम
आयपीएल 2025 च्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली होती, आणि प्लेऑफच्या जवळ येत असताना हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. यापूर्वीच पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आणि त्यांच्या मायदेशी परतण्याच्या मागणीमुळे बीसीसीआयवर दबाव वाढला होता. काही संघांनी आपल्या खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तान सुपर लीगवरही परिणाम
हे ही वाचा >> देशभरात 26 विमानतळं बंद, दिल्लीतील 90 उड्डाणं रद्द... पुन्हा कधी सुरू होणार?
भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम पाकिस्तान सुपर लीग (PSL) वरही झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पीएसएल 2025 स्थगित करण्याची शक्यता व्यक्त केली आहे, असे सकाळ न्यूजने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
ADVERTISEMENT
