Asia Cup Trophy : आशियाच्या चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने ट्रॉफी आपल्या नावावर केलीये. मात्र, तरीही टीम इंडियाला ही ट्रॉफी मिळालेली नाही. यावरुन आता नवा वाद सुरु झालाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी यांनी टीम इंडियाची ट्रॉफी रुमवर नेल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर बीसीसीआयने मोहसीन नकवी यांना खडे बोल सुनावले आहेत. टीम इंडियाने आशिया चषक जिंकलाय, त्यामुळे भारतच ट्रॉफीचा मानकरी असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
तिलक वर्माची अर्धशतकी खेळी आणि कुलदीप यादवच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी (दि.29) खेळवण्यात आलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. हा त्यांचा टी20 फॉरमॅटमधला दुसरा आणि एकूण एशिया कपमधला नववा विजय ठरला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआउट केलं आणि नंतर 147 धावांचं लक्ष्य दोन चेंडू शिल्लक ठेवत गाठलं. तिलक वर्माने 53 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या, तर शिवम दुबेनं 22 चेंडूत 33 धावा काढत पाचव्या विकेटसाठी 60 धावांची महत्त्वपूर्व भागिदारी रचली. याआधी कुलदीप यादवने चार षटकांत 30 धावा देत चार विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येक 2 विकेट्स पटकावल्या.
भारताने नाकारली ट्रॉफी
एशिया कप 2025 जिंकल्यानंतर टीम इंडियाने पीसीबीचे चेअरमन मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यावरून सामना संपल्यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली. भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतरही नकवी स्टेजवरचं थांबले होते.
बीसीसीआयने स्पष्ट केली भूमिका
मोहसीन नकवींकडून भारतीय संघाने ट्रॉफी का घेतली नाही? यावर आता बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टीकरण दिलं. बीसीसीआयचे सचिव म्हणाले, भारत प्रतिस्पर्धी देशामध्ये सीमेवर सध्या युद्धाची स्थिती आहे. त्याच देशातील एका नेत्याकडून आम्हाला ट्रॉफी स्वीकारावी लागणार होती... आम्ही अशा व्यक्तीकडून ट्रॉफी घेऊ शकत नाही जो आमच्या देशाविरुद्ध युद्ध करणाऱ्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि एसीसीचे अध्यक्ष आहेतच, शिवाय ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.
मोहसीन नकवींनी ट्रॉफी हॉटेलमध्ये नेली
Devajit Saikia पुढे बोलताना म्हणाले, आमची ट्रॉफी आणि पदकं, जी आमच्या टीमला मिळायला हवीत. त्यांनी ही ट्रॉफी हॉटेलमध्ये त्यांच्या रुमवर नेली आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना इतकी तरी समज असेल की शक्य तितक्या लवकर ती ट्रॉफी भारतात पाठवावी. यामुळे निदान काही प्रमाणात नैतिकता राखली जाईल.
हेही वाचा : Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देणारा Team इंडियाचा तिलक वर्मा आहे तरी कोण?
ADVERTISEMENT
