टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकाचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारात ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने दुसरं स्थान पटकावत आपलं आव्हान कायम राखलं.
ADVERTISEMENT
यानंतर क्लिन अँड जर्क प्रकारातही मीराबाई चानूने आश्वासक खेळ करत शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतू सुवर्णपदकासाठीच्या प्रयत्नांमध्ये ती अपयशी ठरली आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
कर्नम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टींग प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई चानू पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूने पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ८४ आणि ८७ किलो वजन सहज उचललं. ज्यामुळे या प्रकारात मीराबाईने दुसरं स्थान मिळवलं. दरम्यान चीनच्या होऊ झिऊने ९४ किलो वजन उचलत ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.
दरम्यान ४९ किलो वजनी गटात चीनने सुवर्ण, भारताने रौप्य तर इंडोनिशियाच्या खेळाडूने कांस्य पदकाची कमाई केली. अखेरच्या राऊंडमध्ये मीराबाई चानू आणि चीनच्या खेळाडूमध्ये काटे की टक्कर सुरु होती. परंतू अखेरच्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलण्याच मीराबाई अयशस्वी ठरली आणि सुवर्णपदक चीनच्या नावे निश्चीत झालं.
मीराबाईच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मीराबाईचं कौतुक केलंय.
एकीकडे मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी भारताला पदकाची कमाई करुन दिली असली तरीही नेमबाजीत भारताच्या पदरी अपयश ठरलंय. भारताचा सौरभ चौधरी अंतिम फेरीत पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. महिला नेमबाजपटू अपूर्वी चंदेला आणि एल्वनिल वेल्वरीन यांनीही आज निराशा केली.
ADVERTISEMENT