विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला टेस्ट, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही मालिकांमध्ये पराभवाची धूळ चारली. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर शेवटचा वन-डे सामना खेळवला गेला. या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला. त्याआधी झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने ३-१ तर टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला होता. टीम इंडियाच्या या कामगिरीवर भारतीय प्लेअर्स खुश असले तरीही तिसऱ्या वन-डे सामन्यानंतर विराट कोहलीने केलेल्या एका वक्तव्यामुळे बीसीसीआय आणि कोहलीत एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या वन-डे सामन्यानंतर विराट कोहलीने भारतीय प्लेअर्ससाठीचा व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेस आणला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाला होता विराट कोहली जाणून घ्या…
“भविष्यामध्ये वेळापत्रक आखण्याचा मुद्दा विचारात घेतला जायला हवा. प्रत्येक खेळाडूची मानसिक स्थिती एका वेळेला सारखीच असेल अशी तुम्ही अपेक्षा करु शकत नाही. कधीकधी तुम्हाला या वातावरणाचा उबग येतो आणि तुम्हाला बदलाची गरज असते. सलग दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत Bio Secure Bubble मध्ये राहणं आणि खेळणं सोपं नाही, भविष्यात हे अधिक कठीण होत जाईल. यावर चर्चा होऊन भविष्यात काहीतरी बदल घडेल अशी मला खात्री आहे.”
आता थांबायचं नाही…विराट कोहलीकडून IPL 2021 ची तयारी सुरु
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने हे Bio Secure Bubble वातावरणात खेळवले जात आहेत. यामध्ये प्लेअर्सना Bubble बाहेरील व्यक्तींशी संपर्क ठेवण्यास मनाई असते. परंतू विराट कोहलीने मांडलेलं हे मत BCCI च्या अधिकाऱ्यांना फारसं पटलेलं दिसत नाही. “सध्या कोरोनाच्या काळात पुढे काय होणार आहे याची खात्री देता येत नाही, अशावेळी एका ठराविक वेळेपर्यंतचा अंदाज घेऊन तुम्ही सिरीज प्लान करु शकता…पण त्यापुढे नाही. सध्याच्या काळात एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून वेळापत्रक कसं आखता येईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघात राखीव खेळाडूंची भक्कम फळी आहे, त्यामुळे समजा एखाद्या प्लेअरला विश्रांती घ्यायची असेल तर तो तसं करु शकतो. BCCI ने कधीही कोणत्याही खेळाडूला संपूर्ण सामने खेळायलाच हवेत अशी सक्ती केलेली नाही. राखीव खेळाडूंची फळी भक्कम असताना तर आम्ही अशी सक्ती कधीच करत नाही.” BCCI मधील अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला माहिती दिली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने विराट कोहली आणि अन्य प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवीन संघासोबत इतिहास घडवला होता. अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीचीही यावेळी चांगलीच चर्चा झाली आणि कौतुक झालं. इंग्लंडविरुद्ध वन-डे आणि टी-२० सिरीजमध्येही जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली. पहिल्या दोन टी-२० मॅचमध्ये रोहितने विश्रांती घेतली होती. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय संघाची बेंच स्ट्रेन्थ ही अधिक चांगली असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. इंग्लंडविरुद्धचा दौरा हा वेळापत्रकानुसाप २०२० मध्ये होणार होता, परंतू कोरोनामुळे हा दौरा पुढे ढकलला गेला.
ADVERTISEMENT











