
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यानंतर आता लव्ह जिहादकडे मोर्चा वळवला आहे. लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं बघायला मिळालं. फोनवरून बोलत असताना संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी तक्रार दिली आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केला होता. त्यानंतर राणा या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं.
झालं असं की, मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्याच्या २४ तासानंतरही मुलगी सापडत नसल्यानं मुलीच्या आईवडिलांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेतली. मुलीला शोधावं म्हणून विनंती केली.
मुलीच्या आईवडिलांनी भेट घेतल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांना कॉल केला. त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान फोनवरून पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण करत असतानाच आपला कॉल रेकॉर्ड केला जात असल्याचा संशय नवनीत राणा यांना आला. त्यानंतर त्यांनी कॉल कट केला.
कॉल रेकॉर्ड केल्याचा संशय आल्यानंतर नवनीत राणा या थेट पोलीस ठाण्यात गेल्या. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी कॉल रेकॉर्ड केल्यावरून सवाल केला. पोलिसांनी नवनीत राणांनी विचारणा केल्यानंतर कोणत्याही प्रकार कॉल रेकॉर्ड केलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
मात्र, नवनीत राणा आक्रमक झाल्या आणि कुणाच्या परवानगी कॉल रेकॉर्ड केला. माझा कॉल रेकॉर्ड का केला असं म्हणत नवनीत राणांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसही आक्रमक झाले. त्यामुळे पोलीस ठाण्यात दोन्ही शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे पोलीस ठाण्यात बरीच गर्दी झाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यातून माध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर काढण्यात आलं.