महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?
Virar Crime News : विरारमध्ये अवैध दगड खाणींविरोधात लढा देणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली असून, खाण मालकाने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विरारमध्ये अवैध खाण प्रकरण उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्याची हत्या; मृतदेह त्याच खाणीत फेकला
महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या
Virar Crime News : विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील अवैध खाणींविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या आत्माराम पाटील या आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या खाणीविरोधात त्यांनी तक्रार केली होती, त्याच खाणीमध्ये त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आरोपींनी मोठ्या दगडाने आत्माराम पाटील यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण विरार परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अवैध खाण माफियांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या सौंदर्याची इतकी भूरळ पडली की, प्रेमात वेडा होऊन केलं भयंकर कृत्य!
तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसमोरच हल्ला
या हत्येचा घटनाक्रम अत्यंत अंगावर शहारे आणणारा आहे. मंगळवारी दुपारी वसई तहसीलदार कार्यालयातील सर्कल अधिकारी प्रभाकर पाटील हे एका अन्य अधिकारी आणि चालकासह शिरगाव येथील तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तक्रारीची जागा आणि परिसर दाखवण्यासाठी त्यांनी आत्माराम पाटील यांना त्यांच्या घरातून सोबत घेतले होते. खाणीच्या परिसरात पोहोचताच आधीच तिथे दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने सर्कल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या कानाला दुखापत झाली. जेव्हा आत्माराम पाटील हे सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा आरोपींनी त्यांना लक्ष्य केले आणि मोठ्या दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या भीषण हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं, शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?









