Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण
एकीकडे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. तर ओबीसी समाज याला विरोध करताना दिसत आहे. ओबीसी मतदार भाजपचा मूळ जनाधार आहे. त्यामुळेच भाजपची आरक्षणाच्या मुद्द्यात कोंडी झाली आहे.
ADVERTISEMENT

Maratha Reservation BJP Politics : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. आंदोलकांनी राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एका माजी मंत्र्याची घरे जाळली. बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेनेच्या शिंदे गटातील दोन खासदारांनीही राजीनामे लिहिले. पण, या सगळ्यात अडचण झालीये ती भाजपची. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम नक्कीच होईल, असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. हा मुद्दा वेळीच शांत न झाल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केलीये. जरांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदे यांनी याबद्दल आश्वासन दिले. असं करून राज्य सरकार डॅमेज कंट्रोल करू इच्छित आहे, असं म्हटलं जात आहे.
दुसरीकडे, हे भाजपसाठी आत्मघाती पाऊल असल्याचे बोलले जात आहे. कारण महाराष्ट्रात भाजपचा उदय होण्याचे कारण राज्यातील ओबीसी समाज आहे. पूर्वीप्रमाणेच यावेळीही ओबीसी समाजाने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे आणि त्यामुळेच भाजपच्या अडचणी वाढू शकतात. भाजपसारख्या पक्षाला अडचणीत आणणारे मराठा मतांचे गणित काय आहे ते समजून घेऊ.
मराठा जात महाराष्ट्रात कुठल्या स्थानी?
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात मराठा ही वचर्स्ववादी जात मानली जाते. एखाद्या जातीला वर्चस्व असलेली जात असे म्हटले जाते, जेव्हा तिच्याकडे मजबूत आर्थिक आणि राजकीय ताकद असते. स्थानिक जातिव्यवस्थेत तिचे स्थान खूप खालच्या पातळीवर असते. महाराष्ट्रातील आर्थिक संसाधनांवर आणि राजकीय सत्तेवर मराठ्यांचे नियंत्रण आहे आणि जातीव्यवस्थेत ते वर नाहीत, पण तळाशीही नाहीत.