बंटी पाटील की मुन्ना महाडिक… कोल्हापूरचा किंग कोण?, ‘ही’ निवडणूक ठरवणार!
कोल्हापूरमधील पाटील आणि महाडिक घराणं हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. जिल्ह्यातील राजकारणात आपली सरशी होण्यासाठी दोन्ही कुटुंब प्रतिष्ठा पणाला लावत आहे. अशातच एका निवडणुकीची सध्या कोल्हापुरात बरीच चर्चा आहे.
ADVERTISEMENT

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा आपल्या नजरेसमोर येतो. अगदी तसंच कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की महाराष्ट्रासमोर बंटी पाटील (Bunty Patil) आणि महाडिक (Munna Mahadik) कुटुंबातला संघर्ष समोर येतो. कोल्हापूरच्या राजकारण सहकाराभोवती फिरतं. आणि याच सहकारामुळे या संघर्षाला नवी धार चढली आहे. महाडिक कुटुंबाच्या हातातलं शेवटचं सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी बंटी पाटलांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत पण त्याआधीच त्यांना दोन झटके बसले. तर आपली 25 वर्षांची सत्ता अबाधित राखण्यासाठी महाडिकांची तिसरी पिढी आखाड्यात उतरली आहे. अवघे तेरा हजार मतदार असलेली राजाराम कारखान्याची निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. असं का म्हटलं जातंय आणि या निवडणुकीत कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे आहेत. हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (bunty patil or munna mahadik who is the king of kolhapur rajaram sugar factory election will decide)
कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीचं धुमशान सुरू झालं आहे. यावेळी निमित्त आहे, राजाराम सहकारी साखर कारखान्याचं. गोकूळ, राजाराम ही कोल्हापूरच्या राजकारणातली कळीची सत्ताकेंद्रं आहेत. इथे ज्यांची सत्ता, त्यांच्या कलेनं जिल्ह्याचं राजकारण चालतं, असा रिवाज तयार झाला आहे. कधीकाळी ही सत्ताकेंद्र महाडिक कुटुंबाच्या ताब्यात होतं. संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणातही महाडिकांचा शब्द चालायचा. कुटुंब एक असलं तरी यांचं राजकारण तीन पक्षांत चालायचं. थोरले महाडिक महादेवराव काँग्रेसमध्ये त्यांची दुसरी पिढी धनंजय महाडिक राष्ट्रवादीत, तर अमल महाडिक भाजपमध्ये.
दोन कुटुंबातला संघर्ष
पण 2015 ला महाडिकांच्या या अवाढव्या साम्राज्याला पहिला हादरा बसला. सलग 18 वर्षांची विधान परिषदेतली काँग्रेसकडून मिळालेली आमदारकी गेली. पाटलांनी मातब्बर महादेवरावांचा मानहानीकारक पराभव केला. याआधी 2014 च्या विधानसभेमध्ये भाजपच्या अमल महाडिकांनी काँग्रेसच्या बंटी पाटलांना चीतपट केलं. इथूनच दोन कुटुंबातला संघर्ष सुरू झाला. अमल महाडिक हे महादेवरावांचे सुपुत्र आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा आमचं ठरलंय, असं सांगून पराभव करण्यात आला. यापाठोपाठ सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत अमल महाडिकांना पराभूत केलं.
अधिक वाचा- ‘माझ्यावर 14 केसेस केल्या, मी का क्रिमिनल आहे का? आता महाभारत होणार! महाडिकांचा इशारा
‘आमचं ठरलंय…’
कधीकाळी सगळी सत्ता उपभोगणारं महाडिक कुटुंब अचानक सत्तापदांपासून दूर गेलं. यानंतर बंटी पाटलांनी हसन मुश्रीफांना सोबत घेत आमचं ठरलंय, गोकूळ उरलंय असं म्हणत या निवडणुकीत महाडिकांच्या सत्तेला खुलं आव्हान दिलं आणि याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं केंद्र असलेल्या गोकूळ दूध संघातली महाडिकांची सद्दी संपली.