Jayant Patil : निलेश राणेंसह अजित पवारांचा घेतला समाचार; जयंत पाटलांचे भाषण चर्चेत
Jayant Patil Ajit Pawar Nilesh Rane : जयंत पाटील यांनी निलेश राणे आणि अजित पवारांबद्दल व्यक्त केली नाराजी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

निलेश राणेंची शिविगाळ, जयंत पाटील काय बोलले?

अजित पवारांबद्दल जयंत पाटलांनी काय भूमिका मांडली?
Jayant Patil Nilesh Rane Ajit Pawar : चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला. या कार्यक्रमानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना सार्वजनिक कार्यक्रमातच शिविगाळ केली. या प्रकरणावरून आज (18 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंत व्यक्ती केली. त्यांनी अजित पवारांनाही चिमटा काढला.
लातूर येथे विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "विलासराव देशमुख असते, तर काँग्रेस आज अधिक संपन्न, अधिक सामर्थ्यवान झाली असती. विश्वजित कदम, सतेज पाटलांनी आग्रह केला आहे की, नवे नेतृत्व म्हणून अमित देशमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे यावे."
"एकेकाळी भक्कम अशी काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती. माझं आजही असं मत आहे की, ती विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामुळेच होती", असे मत जयंत पाटील यांनी मांडले.
निलेश राणेंची शिविगाळ, पाटील काय बोलले?
माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना केलेल्या शिव्यांच्या प्रकाराबद्दल जयंत पाटील म्हणाले, "आज राजकारण बदलेलं आहे. राजकारणात विचार लोप पावलेले आहेत आणि मोठंमोठ्या नेत्यांची मुलं आता शिव्या देण्यापर्यंत पोहोचली आहेत."
"आपल्यापैकी किती जणांनी ऐकलं असेल, मला माहिती नाही. पण, एखाद्यावर संताप व्यक्त करताना किती खालच्या दर्जाला राजकारण जातं आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता कुठेतरी थांबलेलं बरं", अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.