Maharashtra Weather: आज नारळी पौर्णिमा.. दर्याराजा शांत होणार की खवळणार? पाहा महाराष्ट्रातील हवामान
Maharashtra Weather Today: आज नारळी पौर्णिमा असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील जाणून घ्या कसं असेल महाराष्ट्रातील नेमकं वातावरण.

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार आज (8 ऑगस्ट) महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मिश्र स्वरूपाचे हवामान पाहायला मिळेल. पावसाचा जोर कायम असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण, मराठवाडा, आणि विदर्भातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज आहे.
कोकण आणि गोवा
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी: या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे, आणि 24 तासांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
विशेष सूचना: कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग 40-50 किमी प्रतितास असू शकतो, त्यामुळे मासेमारीसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाडा
नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी: मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-शेतीसाठी सूचना: पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांना फायदा होऊ शकतो, परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
विदर्भ
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट जारी असून, जोरदार वारे (40-50 किमी प्रतितास) आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नदी काठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, कारण पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात रिमझिम पावसामुळे उकाड्यात काहीसा दिलासा मिळेल.
खडकवासला धरणात 65% जलसाठा असून, पाण्याचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, जळगाव, धुळे या भागात ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस हलका असेल.
हवामान विभागानुसार, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.